कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचा मतांचा कोटा असूनही संजय पवार पराभूत झाले. पक्षाशी ते प्रामाणिक नसल्याने आणि गद्दारीमुळेच त्यांच्यावर हा प्रसंग आला. महापालिका निवडणुकीत डिपॉझिट जप्त झालेले पवार माझ्यावर आरोप करत आहेत. पवार हे फुटके रेडिओ आहेत, असा पलटवार राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत केला.
मी एकनिष्ठ असल्यानेच जनतेने मला दोनवेळा आमदार केले, पण 2019 मध्ये पवार यांनीच शिवसेनेशी गद्दारी केल्याने माझा पराभव झाल्याचा आरोपही त्यांनी केला. पोटनिवडणुकीत मला संधी होती. परंतु शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार मी थांबलो. विरोधकांनी मला प्रलोभने दाखविली. मात्र, मी प्रामाणिक राहिल्यानेच काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला. आता ज्यांना आयुष्यात गुलाल लागलेला नाही, त्यांचा माझ्यावर आरोप करण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. आजच्या मेळाव्याला दोन्ही खासदार का आले नाहीत? याचा पक्ष नेतृत्वाने गांभीर्याने विचार करावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दहा हजार शिवसैनिकांचा मेळावा घेणार आहे, असेही क्षीरसागर सांगितले.