कोल्हापूर : नागावचा तरुण अपघातात ठार; दोघे गंभीर | पुढारी

कोल्हापूर : नागावचा तरुण अपघातात ठार; दोघे गंभीर

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
आष्टा- भिलवडी (जि. सांगली) रोडवर नागठाणे फाट्याजवळ झालेल्या अपघातात नागाव (ता. हातकणंगले) येथील विनायक वसंतराव माळी (वय 25) ठार झाला, तर त्याचे मित्र आशुतोष राजेंद्र शेळके (29, रा. शेळकेवाडी, ता. करवीर), प्रणव राऊसाहेब पाटील (26, माणगाव, ता. हातकणंगले) जखमी आहेत. बुधवारी रात्री उशिरा अपघात झाला. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.

विनायकसह त्याचे साथीदार आशुतोष व प्रणव बुधवारी रात्री दुचाकीवरून नागठाणेकडे जात होते. नागठाणे फाट्याजवळ दुचाकीला अपघात झाला. विनायकच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. ग्रामस्थांनी तिघांनाही रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयाकडे पाठविले. मात्र, उपचारापूर्वीच विनायकचा मृत्यू झाला. अन्य दोघांवर उपचार सुरू आहेत.

विनायक माळी अविवाहित होता. लहानपणीच आई, वडिलांचे निधन झाल्याने चुलते अमित खांडेकरसह नातलगांनी त्याचा सांभाळ केला होता. विनायक खासगी फर्ममध्ये नोकरीला होता. येत्या वर्षात त्याचा विवाह करण्यासाठी नातेवाईकांचे प्रयत्न सुरू होते. अपघातात त्याच्या निधनाची बातमी समजताच नागाव परिसरातून हळहळ व्यक्‍त होत आहे.

Back to top button