कोल्हापूर : स्टेटस दिसला अन् बालविवाह रोखला! | पुढारी

कोल्हापूर : स्टेटस दिसला अन् बालविवाह रोखला!

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
शाहूवाडी तालुक्यात एका व्हॉटस्अ‍ॅप स्टेटसमुळे बालविवाह रोखण्यात ‘अवनि’ला यश आले आहे. ‘अवनि’ला अवघ्या दहा दिवसांत जिल्ह्यातील कपिलेश्‍वर (ता. राधानगरी), इचलकरंजी, राजेंद्रनगर आणि आता शाहूवाडीमध्ये असे चार बालविवाह रोखण्यात यश आले आहे.
10 मेदरम्यान पहिला बालविवाह रोखला होता. यामध्ये अवनिच्या जागर प्रकल्पातील कार्यकर्त्यांसोबतच महिला बालकल्याण विभागाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. शाहूवाडी तालुक्यातील 17 वर्षीय मुलीचा साखरपुडा दोन दिवसांपूर्वी झाला होता. शुक्रवारी (दि. 20) तिचे नियोजित लग्‍न होण्याआधी हा विवाह रोखण्यात आला. मुलीचे मूळ गाव पन्हाळा असून वडील व्यसनाधीन असल्याने शाहूवाडी येथील मामाकडेच ती लहानाची मोठी झाली.

तिची आई रोजंदारी करते. मामाच्या गावात राहणार्‍या या मुलीचे त्याच गावातील एका मुलासोबत लग्‍न ठरले आणि साखरपुडाही पार पडला. अशातच कुटुंबातील एका सदस्याने मोबाईलवर साखरपुड्याचा स्टेटस लावला अन् बातमी सर्वदूर पोहोचली. याची पडताळणी करून जागर प्रकल्पाच्या समन्वयक प्रमोदी पाटील यांनी संस्था अध्यक्षा अनुराधा भोसले यांना माहिती दिली. त्यानंतर बालविवाह होण्याआधीच मुलगा आणि मुलीला तसेच त्यांच्या पालकांना बालकल्याण समितीसमोर हजर केले. समुपदेशनानंतर हा बालविवाह रोखून मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर विवाह करण्याची ग्वाही दोन्ही कुटुंबीयांनी दिली आहे.

बालविवाह रोखण्यासाठी ‘अवनि’चे व्यवस्थापक सचिन ठाणेकर, सामाजिक कार्यकर्ते सिद्धांत घोरपडे, बालकल्याण समिती सदस्य अ‍ॅड. दिलशाद मुजावर, अध्यक्ष वैशाली बुटाले, शाहूवाडी बाल विकास प्रकल्प अधिकारी स्नेहल माने, विस्तार अधिकारी अनिल पाजई यांचे सहकार्य लाभले.

बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती महत्त्वाची

बालविवाह रोखण्यासाठी यंत्रणेतील सर्व घटकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. अंगणवाडी सेविकांनी किशोरवयीन मुलींचे मेळावे घ्यावेत, महिला बचत गटांच्?या मासिक सभा , ग्रामसभा या माध्यमातून बालविवाह रोखण्यासाठी लोकसहभागातून प्रबोधनात्मक पाऊल उचलत असे विवाह करू इच्छिणार्‍या वधू-वर पालकांच्?या मानसिकतेत बदल घडवून आणणे गरजेचे आहे.

Back to top button