![गुणरत्न सदावर्तेंविरुद्ध कोल्हापुरातही गुन्हा दाखल; लवकरच अटकेची कारवाई](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F04%2F%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%89%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाला सातत्याने विरोध करून मराठा समाज आणि मागासवर्गीय समाज यांच्याविषयी चिथावणीखोर वक्तव्य करून सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरुद्ध शनिवारी सायंकाळी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. संशयित सदावर्ते यांना लवकरच अटक करण्यात येईल असेही शाहूपुरी पोलिसांना सांगितले.
मराठा समाज समन्वयक समितीचे दिलीप मधुकर पाटील (रा. कोल्हापूर) यांनी दोन दिवसांपूर्वी शाहूपुरी पोलीस ठाण्याकडे तक्रार दाखल करून अडवोकेट सदावर्ते यांना अटक करण्याची लेखी मागणी केली होती.
पोलिसांनी संबंधित तक्रार अर्जावर ज्येष्ठ विधिज्ञ व विधी अधिकारी यांचा अभिप्राय घेऊन सदावर्ते यांच्यावर आज सायंकाळी गुन्हा दाखल केला आहे. सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. कोल्हापुरात दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना लवकरात लवकर कारवाई केली जाईल, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
छत्रपतींच्या वारसांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सातारा शहर पोलिसांनी गुणरत्न सदावर्ते यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता ६ वे प्रथम न्यायदंडाधिकारी एस. ए. शेंडगे यांनी सदावर्ते यांना सोमवार पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. यावेळी कोर्टात दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायाधीशांनी युक्तिवादाचे अवलोकन करून निर्णय दिला.
सरकार पक्षाने १४ दिवसांची पोलीस कोठडी मागत विविध मुद्द्यांचा तपास करायचा असल्याचे सांगितले. यावेळी तपास अधिकारी आणि सरकार पक्षाचे दोन वकील असे तिघेजण बोलले. सरकार पक्षाचा युक्तिवाद झाल्यानंतर बचाव पक्षाच्या वतीने सर्व मुद्दे खोडून काढण्यात आले आणि पोलिस कोठडीची आवश्यकता नसल्याचे सांगण्यात आले.
युक्तिवाद सुरू असताना दोन्ही पक्षांमध्ये दोनदा खडाजंगी झाली. खा. उदयनराजे यांचा पराभव का झाला? असा मुद्दा बचाव पक्षाने मांडताच सरकार पक्षाने त्यावर तीव्र आक्षेप घेतला. यावर बचाव पक्षाने हे वक्तव्य मागे घेत सपशेल माफी मागितली. माफीनाम्यानंतर सरकार पक्षाने सुमोटो गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली.
हे ही वाचलं का ?