विशाळगड : चारी बाजूंनी भरगच्च डोंगररांगा व खोल दऱ्या यामुळे 'गनिमी कावा' या युद्धनीतीला पूरक असा विशाळगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुख्य हालचालींचा केंद्र बनला होता. राज्य शासनाने या गडाला पर्यटनाचा 'ब' दर्जाही जाहीर केला आहे. मात्र गडाच्या विकासासाठी मंजूर झालेला १५० लाखांचा निधी अन्यत्र वर्ग केल्याने यामागचे गौड बंगाल काय? आणखी किती काळ गडाला विकासाची प्रतिक्षा करावी लागणार, असा प्रश्न उपस्थित होत असून गडवासीय, इतिहासप्रेमी आणि पर्यटकांतून नाराजीचा सूर उमटत आहे.
शिलाहार वंशातील भोज राजाने हा किल्ला बांधला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी गडाची मजबूत डागडुजी करून 'विशाळगड' असे नामकरण केले. हा किल्ला डोंगरी किल्ला म्हणून देखील ओळखला जातो. समुद्र समुद्रसपाटीपासून ३,३०० फूट उंच, ३,२०० फूट लांब व १०४० फुट रुंद किल्ला आहे. गडाची तटबंदी जांभा खडकात कोरली आहे. अनेक विहिरी, मंदिरे, तलाव, बुरुज, मजबूत दिंडी दरवाजे आजही पडझड अवस्थेत दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहेत. गडावर हजरत पीर मलिक रेहान बाबांचा दर्गा आहे. त्यामुळे ऐतिहासिक व धार्मिक स्थळ म्हणून प्रसिध्द आहे. कोल्हापूर शहरापासून किल्ला जवळच असल्याने सुट्टीसह अन्य दिवशी येथे गर्दी असते.
येथे पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत १० नोव्हेंबर २०२३ रोजी शिवकालीन किल्ले विशाळगडाच्या सुधारणा व सुशोभीकरणासाठी १५० लाखाचा निधी मंजूर करण्यात आला. निधी मंजूर झाल्याने गडवासीय, पर्यटक, भाविक आणि इतिहासप्रेमीतून आनंद व्यक्त करण्यात आला. गडाच्या विकासात्मक कामाला आज ना उद्या सुरुवात होईल, अशी अपेक्षा असताना १३ जून २०२४ पत्रकाने १५० लाखांचा मंजूर निधी अन्यत्र वळविण्यात आला. मंजूर निधी अन्यत्र का वळविला? यामागचे गोडबंगाल काय? आदी चर्चेला उधाण आले आहे. गडावरील अनेक पुरातन वास्तू दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असताना गडाच्या विकासाकडे शासनाचे दुर्लक्ष का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शासनाने गडाचे स्वरूप बदलायचे ठरवले तर येथे पुष्कळ काही करण्यासाठी विस्तीर्ण जागा आहे. विशाळगड विकसित करण्यासाठी कोणत्याच हालचाली शासकीय पातळीवर दिसून येत नसल्याने इतिहासाची साक्ष देणाऱ्या विशाळगडाला अजून किती काळ प्रतीक्षा करावी लागणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विशाळगडासाठी खासदार धैर्यशील माने यांच्या प्रयत्नातून १५० लाख रूपये निधी पर्यटन विभागामार्फत मिळाला होता. या निधीमधून गडावरील पुरातन ऐतिहासिक मंदीरे, सुशोभीकरण, किल्ल्यावरील रस्ते, बाजीप्रभू, फुलाजीप्रभू देशपांडे बंधूंच्या समाधी स्थळाचे संवर्धन तसेच गडावरील १३ मंदिरांचा जीर्णोद्धार करणेचे अंदाजपत्रक टेंडर मार्च २०२४ मध्ये काढले होते. निवडणुका आचार संहितेमुळे टेंडर वर्क ऑर्डर झाली नाही. निवडणुक झाल्यानंतर अचानक १३ जूनच्या परिपत्रकात मंजूर निधी अन्यत्र वळविण्यात आल्याने राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून हा निधी इतरत्र वळविला असल्याचा संशय ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
- बंडू वेल्हाळ, ग्रामस्थ गजापूर