कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. धरण क्षेत्रांत सुरू असलेल्या पावसामुळे गेल्या 24 तासांत पंचगंगेच्या पाणी पातळीत 2 फुटांची वाढ होऊन पाणी पातळी रात्री 9 वाजता 20 फूट 7 इंचांवर पोहोचली होती. राधानगरी धरणातून 1,100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने राजाराम, शिंगणापूर, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, यवलूज, चिंचोली, माणगाव असे 9 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गेल्या 24 तासांत कोल्हापुरात सरासरी 18.1 मि.मी. पाऊस झाला असून, सर्वाधिक 39.2 मि.मी. पाऊस राधानगरी तालुक्यात झाला आहे.
शहरात मंगळवारी सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली होती. दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. यामुळे शहरातील सकल भागात पाणी साठले, यामुळे दुचाकीस्वारांसह नागरिकांची तारांबळ उडाली होती. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत मंगळवारी पावसाने हजेरी लावली होती. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस गगनबावडा (38.4 मि.मी.), चंदगड (36.1), पन्हाळा (34.6), शाहूवाडी (30.1) या तालुक्यांत झाला आहे. यामुळे घटप्रभा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अहवालानुसार, 6 जुलैपर्यंत मध्यम पाऊस व ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. त्यानंतर चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
राधानगरी तालुक्यात सर्वाधिक पाऊस सरवडे येथे (79 मि.मी.) येथे झाला आहे. त्यानंतर कसबा तारळे येथे 61, राधानगरी येथे 59.8, पन्हाळा तालुक्यात बाजार भोगाव येथे 55.8, कोतोली 49, तर गगनबावडा तालुक्यात साळवण येथे 49.5 मि.मी. पाऊस झाला आहे. शहरात दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. पावसापासून संरक्षणासाठी प्लास्टिक कागद खरेदीसाठी तसेच छत्री दुरुस्तीसाठीदेखील नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे.