

कोल्हापूर ; दिलीप भिसे : मुलींसह कॉलेज युवतींच्या असहाय्यतेचा फायदा घेत छेडछाड करणार्या रोडरोमिओंविरुद्ध निर्भया पथकाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. लॉकडाऊननंतर जिल्ह्यातील 16,396 रोडरोमिओंवर कायद्याचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यात सर्वाधिक कोल्हापूर शहर, करवीर, जयसिंगपूर विभागातील कारवायांचा समावेश आहे.
कॉलेज कॅम्पसह सार्वजनिक ठिकाणी कॉलेज तरुणींसह महिलांना एकाकी गाठून जवळीक साधण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. टवाळखोरांची दहशत, बदनामीची धास्तीमुळे होणारा मानसिक त्रास कुटुंबप्रमुखांच्या कानावर न घालता स्वत: सहन करण्याच्या घटनांमुळे समाजकंटकांनी धुमाकूळ घातला आहे. टवाळखोरांच्या त्रासाला कंटाळून जिल्ह्यात डझनभर युवतींनी जीवनाचा शेवट करून घेतल्याची उदाहरणे आहेत.
निर्भया पथकांना कारवाईचे सर्वाधिकार
टवाळखोरीला लगाम घालण्यासाठी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांतर्गत प्रभारी पोलिस अधिकार्यांच्या नियंत्रणाखाली निर्भया पथकाची स्थापना करून कठोर कारवाईचे अधिकार प्रदान केले. त्यानुसार 2021 मध्ये रेकॉर्डब—ेक एकूण 16 हजार 396 रोडरोमिओंना कायद्याच्या कचाट्यात अडकविण्यात आले आहे.
शहरातील 4 हजारांवर समाजकंटक 'रडार'वर
कोल्हापूर शहर 4103, करवीर 3768, जयसिंगपूर 3088, शाहूवाडी 1930, इचलकरंजी 1881, गडहिग्लज 726 यानुसार 16 हजार 396 खटल्यांत रोडरोमिओंवर कायद्याचा बडगा उगारण्यात आला आहे.