![Valentine’s Day Special : आंतरजातीय विवाहांमध्ये महाराष्ट्र दुसर्या स्थानी](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F02%2F3-19-7-e1644805635303.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
कोल्हापूर ; आशिष शिंदे : व्हॅलेंटाईन डे (Valentine's Day Special) म्हटलं की, प्रेमविवाह आलाच. अनेकदा प्रेमविवाह हा आंतरजातीय वा आंतरधर्मीय असतो. अशा प्रेमवीरांना नेहमीच समाजाचा तसेच घरच्यांचा मोठा विरोध सहन करावा लागतो. मात्र 'प्यार किया तो निभाना भी पडेगा…' असे म्हणत आंतरजातीय विवाह करणार्याची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. पुरोगामी विचारांच्या कोल्हापूर जिल्ह्यात, तसेच राज्यातील अनेक जोडपी आंतरजातीय विवाह करून सुखाने नांदत आहेत. यामुळे देशात आंतरजातीय प्रेमविवाहामध्ये महाराष्ट्रचा दुसरा क्रमांक लागतो.
आंतरजातीय विवाह करणार्या जोडप्यांमध्ये अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमातींपैकी एक घटक असल्यास त्या जोडप्यांना केंद्र सरकारकडून तसेच राज्य सरकारकडून आर्थिक सहाय्य केले जाते. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या 2020-21 च्या अहवालानुसार देशात असे 23 हजार 355 आंतरजातीय विवाह झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा लागतो. पहिल्या क्रमांकावर कर्नाटक राज्य आहे. या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यात 250 हून अधिक जोडप्यांनी आंतरजातीय विवाह केल्याची नोंद समाज कल्याण विभागाकडे आहे.
महाराष्ट्रात 2020-21 या कालावधीत 3 हजार 956 जोडप्यांनी केंद्राच्या आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ घेतला आहे. केंद्र सरकारकडून या जोडप्यांना एकूण 2 हजार 137 लाख रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले आहे. कर्नाटकातील 5 हजार 20 जोडप्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून 4 हजार 521 रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यात आले.
जातीची बंधने होत आहेत सैल (Valentine's Day Special)
इन्स्टंट डेटिंग-सेटिंगच्या युगामुळे काही प्रमाणात जातीची बंधने सैल होत चालल्याचे पाहायला मिळत आहे. 2018 -19 मध्ये देशात 21 हजार 1,167 जोडप्यांनी आंतरजातीय विवाह केला होता. 2019-20 मध्ये 23 हजार 355 जोडपी आंतरजातीय विवाहाच्या बंधनात अडकली होती. राज्यात 2018 -19 मध्ये 3 हजार 362 व 2019-20 मध्ये 3 हजार 956 जोडप्यांनी आंतरजातीलय विवाह केला होता.
आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांसाठी योजना (Valentine's Day Special)
सामाजिक विषमता दूर होऊन समाजामध्ये समतेची भावना रुजावी. एकात्मता द़ृढ व्हावी व समाज एकसंध व्हावा, जातीपातीचे समूळ निर्मूलन व्हावे यासाठी आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना आर्थिक सहाय्य ही योजना राबविली जात आहे. दाम्पत्यापैकी एक व्यक्ती सवर्ण हिंदू समाजाची व दुसरी मागासवर्गीय अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावी. त्याचप्रमाणे मागासवर्गीय आंतरप्रवर्गातील आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना हा लाभ देण्यात येतो.
आंतरजातीय विवाह : 1 कोटी 25 लाखांचे साहाय्य
कोल्हापूर जिल्ह्यात 11 डिसेंबर 2020 ते जानेवारी 2021 अखेर 250 आंतरजातीय विवाह झाल्याची नोंद समाजकल्याण विभागाकडे आहे. या 250 जोडप्यांनी आर्थिक साहाय्य मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार 250 प्रस्तावांकरिता केंद्राकडून 62 लाख 50 हजार व राज्य सरकारकडून 62 लाख 50 हजार असे सव्वा कोटी रुपयांचे आर्थिक साहाय्य करण्यात आले आहे.