कोल्हापूर : जिल्हाधिकारी म्हणाले पूर परिस्थितीत नागरिकांनी सतर्क रहावे | पुढारी

कोल्हापूर : जिल्हाधिकारी म्हणाले पूर परिस्थितीत नागरिकांनी सतर्क रहावे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूरचे  जिल्हाधिकारी म्हणाले पूर परिस्थितीत नागरिकांनी सतर्क रहावे. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे.त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.

पुरामुळे बाधित होणार्‍या नागरिकांबरोबरच सर्वांनी प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून सहकार्य करावे, जेणेकरून वेळेत मदत उपलब्ध करून देऊन जीवित व वित्तहानी टाळता येईल, असेही त्यांनी सांगितले.

रेखावार म्हणाले, पावसाच्या पाण्यामुळे बंद केलेले रस्ते नागरिकांनी ओलांडू नयेत. तसेच या ठिकाणी लावण्यात आलेले बॅरिकेटस् काढण्याचा प्रयत्न करून स्वत:चा व कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालू नये. पूर परिस्थितीत मदत कार्यासाठी एनडीआरएफची दोन पथके जिल्ह्यात दाखल झाली असून, एक पथक शिरोळ तालुक्यात तर दुसरे पथक करवीर येथे दाखल झाले आहे. गर्भवती महिला, कोरोना रुग्ण, प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिक तसेच गंभीर आजाराच्या रुग्णांना वेळेत उपचार मिळवून देण्यासाठी आरोग्य विभागाने तयारी केली आहे. प्रशासन, आरोग्य विभाग, आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सूचनांचे पालन करावे.

पूर परिस्थितीत नागरिकांच्या स्थलांतरासाठी प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी निवार्‍याची व्यवस्था केली आहे. नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होताना आवश्यक ती महत्त्वाची कागदपत्रे, आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड, मौल्यवान वस्तू, औषधे, स्वत:चे साहित्य आवश्यक तेवढे कपडे, दोरी आदी साहित्य सोबत घ्यावे. घर सोडताना घरातील सोफा, टीव्ही कपाटे आदी घरांतील सर्वात उंच ठिकाणी ठेवावे. घरातील लाईटचा मेन स्विच, गॅस सिलिंडर बंद करावेत, असेही आवाहन जिल्हाधिकारी रेखावार यांनी केले.

Back to top button