रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : आठवड्याच्या प्रारंभी झोडपून काढणार्या पावसाचा जोर गेले दोन दिवस ओसरला. मात्र, गुरुवारी संध्याकाळी पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. रात्रीही जोर धरलेला पाऊस शुक्रवारी सकाळी पुन्हा आवरता झाला. मात्र, दुपारनंतर पुन्हा त्याने फेर धरायला सुरुवात केली. दरम्यान, आगामी 24 तासांत पुन्हा जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यानुसार वीकेंडला जिल्ह्यात 'रेड अलर्ट' जारी करताना किनारी भागात मच्छीमारांनी सागरी मासेमारीसाठी जाऊ नये, अशा सूचना केल्या आहेत. या कालावधीत किनारी भागात ताशी 40 ते 60 कि.मी. वेगाने वारे वाहणार असून किनारी गावांनी खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
गेले दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरलेला राहिला. शुक्रवारी 96 मि.मी.च्या सरासरीने 871 मि.मी.एकूण पावसाची नोंद झाली. यामध्ये लांजा तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला. लांजा तालुक्यात दिवसभरात 214 मि.मी. पावसाची नोंद झाली. मंडणगड, खेड, चिपळूण आणि राजापूर तालुक्यात 100 मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाला. दापोली 71, गुहागर 44, संगमेश्वर 62 आणि रत्नागिरी तालुक्यात 56 मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आता पर्यंत 1309 मि.मी.च्या सरासरीने पावसाने बारा हजार मि. मी.ची मजल मारली आहे. दरम्यान, पावसाचा जोर ओसरला असला तरी आदाम दोन दिवस कोकण किनारपट्टी भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात शनिवार आणि रविवार या वीकेंडच्या दिवसात रेड अलर्ट राहणार आहे. तसेच दोन दिवस जोरदार पवसाने अनेक भागातील रस्ते बाधित झाले आहेत. त्याचा परिणाम वीकेंडला येणार्या पर्यटकावंर होणार आहे. किनारी भागातही खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या असून, जिल्ह्यातील किनारेही वीकेंडसाठी उपलब्ध होणार नसल्याने पर्यटक आणि वर्षा सहलीसाठी येणार्यांचा हिरमोड होणार आहे.
जिल्ह्यात पूरस्थिती नियंत्रणात असली तरी खेड तालुक्यातील जगबुडीचा जलस्तर अद्यापही इशारा पातळीच्या वरच आहे. राजापूर तालुक्यातील कोदवली नदीही इशारा पातळी बाहेर वाहत आहे. त्यामुळे खेड, राजापूर शहरात अद्यापही पूरसद़ृश स्थिती आहे. आसपासच्या गावांना सतर्कतेच्या सूचना प्रशासनाने सुरू केलेल्या चॅटबॉट या नव्या माहिती प्रमाणालीद्वारे केल्या आहेत.