रत्नागिरी : अवकाश तंत्रज्ञानाच्या मदतीने होणार जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन

रत्नागिरी : अवकाश तंत्रज्ञानाच्या मदतीने होणार जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन
Published on
Updated on

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा :  मागील काही वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यात पूर, भूस्खलनाबरोबरच वादळांचा सामना करावा लागला आहे. या संकट कालावधीला जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागाने नेटाने तोंड देत नागरिकांना दिलासा दिला आहे. यापुढे भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) सहकार्याने राज्य शासनाने आपत्ती व्यवस्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. राज्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी रत्नागिरीसह राज्यातील अठरा जिल्ह्यांमधील आपत्ती व्यवस्थापन अधिकार्‍यांना सहा दिवसांचे मूलभूत प्रशिक्षण देण्यात आले आहे.

आपत्ती व्यवस्थापनासाठी राज्य शासनासोबतच केंद्र शासनाच्याही विविध योजना प्रत्येक जिल्ह्यात राबवल्या जात आहेत. अनेक उपक्रमही सुरू आहेत. सध्या बदलत्या अवकाश तंत्रज्ञानाचा वाढता वापर तसेच उपग्रहांची आपत्ती व्यवस्थापनासाठी चांगली मदत होणार आहे. राज्य शासनाने उपग्रह आधारित आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सर्वाधिक आपत्तीग्रस्त 18 जिल्ह्यांचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन संचालनालयाचे उपसचिव, मुंबई महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभागातील 8 अधिकारी आदींसह 30 जणांचे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण झाले. या शिबिराला रत्नागिरीचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी उपस्थित होते.

अवकाश तंत्रज्ञानाच्या वापराने जिल्ह्याचा नकाशा तयार करणे, उपग्रहांवरून तत्काळ सद्यस्थिती (रिअल टाईम लाईव्ह पिक्चर) उपलब्ध करणे, त्याद्वारे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रत्येक गाव, शहराचा गुगल नकाशा, त्यामध्ये सर्व रस्ते, सर्व शासकीय कार्यालये, रुग्णालयांसह संबंधित गाव-शहराची सर्व माहिती उपलब्ध करून एका क्लिकद्वारे आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची माहिती देण्यात आली.

उपग्रहांचे काम, त्यांचे प्रकार कोणते, त्यांची फिरण्याची कक्षा त्याद्वारे माहितीची देवाण-घेवाण करणे, माहिती संकलित करणे याचे प्रशिक्षण देण्यात आले. काही उपग्रहांचे प्रत्यक्ष कामही दाखवण्यात आले. वेगवेगळ्या देशांनी विविध कारणांसाठी सोडलेले उपग्रह, त्यांची होणारी मदत याचेही प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. अवकाश तंत्रज्ञानाशी संबंधित वापर करता येणारी तसेच मोफत व सहजपणे उपलब्ध होणारी विविध सॉफ्टवेअर्स, त्यांचा वापर याची माहिती देण्यात आली. या प्रशिक्षणाच्या आधारे आता आराखडा तयार करण्यात येणार आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी अवकाश तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाल्यानंतर राज्य शासनाकडून केवळ आपत्ती व्यवस्थापनासाठी उपयोगात येणारा स्वतंत्र उपग्रहही सोडला जाण्याची शक्यता आहे. या उपक्रमासाठी 'इस्रो' आवश्यक ती सर्व तांत्रिक मदत, प्रशिक्षण देत आहे. 'इस्रो'च्या वतीने पिल्लई अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कार्तिक नारायणन यासाठी समन्वयक म्हणून काम पाहत आहेत.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकार्‍यांना सहा दिवसांचे मूलभूत प्रशिक्षण दिले आहे. या संदर्भात सातत्याने नवनवीन तंत्रज्ञानासंदर्भात प्रशिक्षण होत असतात. प्रशासनाकडून नवीन माहिती दिली जात असते.
-अजय सूर्यवंशी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रत्नागिरी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news