रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : सरकारी शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रचलित अभ्यासक्रमाची पुस्तके चार भागात उपलब्ध होणार आहेत. या पुस्तकांच्या प्रत्येक घटक, पाठ, कवितेच्या मागील बाजूस वह्यांची पाने जोडण्यात आली आहेत. मात्र, खासगी विनाअनुदानित विद्यार्थ्यांसाठी पूर्वीप्रमाणेच अखंड पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात आल्याचे पाठ्यपुस्तक मंडळाने जाहीर केले आहे. खासगी व सरकारी शाळा अशी वर्गवारी होत असल्याने खरंच विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझ्यामुळे त्यांना पाठदुखी, मानदुखीसह आरोग्याच्या तक्रारी उद्भवत असल्यामुळे शिक्षण विभागाने दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या आहेत. त्यामध्ये वही आणि पुस्तक असे दोन वेगवेगळ्या वस्तू बाळगण्यापेक्षा पुस्तकालाच वह्यांची पाने जोडण्याचा प्रस्ताव समोर आला. या पार्श्वभूमीवर शिक्षण तज्ज्ञ, पालकांमधून सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार बालभारतीच्या महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडून अंमलबजावणी होणार आहे.
येत्या नवीन शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व सरकारी व खासगी अनुदानित शाळांमध्ये इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणारी मोफत पाठ्यपुस्तकेही प्रत्येक घटकानंतर वह्यांची पाने लावलेली असतील. मात्र, खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये मात्र पूर्वीप्रमाणे संपूर्ण अभ्यासक्रम असलेली पाठ्यपुस्तकेच घ्यावी लागणार आहेत. तसेच वैकल्पिक विषयांची पुस्तके स्वतंत्र उपलब्ध केली जाणार आहेत. पाठ्यपुस्तक अभ्यासक्रम मंडळानेही बाजारपेठेतील विक्रेत्यांकडील उपलब्ध साठा संपल्याशिवाय नवीन पुस्तके देता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
पाठ, कविता, घटकाच्या मागे वह्यांची पाने जोडलेली पाठ्यपुस्तके सरकारी व खासगी अनुदानित शाळांमध्ये उपलब्ध होणार आहेत. तसेच विनाअनुदानित व स्वयं अर्थसाहाय्यित शाळेतील विद्यार्थ्यांना बाजारपेठेतून पाठ्यपुस्तके खरेदी करावी लागणार आहेत. मात्र, बाजारपेठेत जुन्या छपाईचाच साठा सध्या उपलब्ध आहे. त्यामुळे खासगी शाळांना पूर्वीप्रमाणेच अखंड पाठ्यपुस्तकांचीच खरेदी करावी लागणार आहे.