

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा : नवीन शैक्षणिक वर्षातील जिल्ह्यातील प्राथमिकच्या 2 हजार, माध्यमिक 350 शाळांचे वर्ग बुधवारपासून सुरू झाले. ठिकठिकाणी विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ढोलताशांच्या गजरात वाजत-गाजत नवागतांचे स्वागत करण्यात आले. सुमारे दोन वर्षे बंद असलेल्या ज्ञानमंदिरांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला आहे. तब्बल दीड लाख विद्यार्थ्यांचे पाऊल शाळेत पडले आहे.
उन्हाळी सुट्टी संपून नवीन शैक्षणिक वर्ष 13 जून रोजीच सुरू झाले असले तरी विद्यार्थ्यांची शाळा बुधवारी सुरू झाल्या. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच शाळांमध्ये प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वच ठिकाणी नवागतांचे ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत स्वागत करण्यात आले.
जिल्ह्यातील प्राथमिकच्या 2 हजार, माध्यमिक 350 शाळांचे वर्ग बुधवारपासून सुरू झाले. मध्यंतरीच्या कालावधीत शाळा सुरू झाल्या होत्या. मात्र, पाचवीपासून पुढील वर्ग सुरू होते. पहिली ते चौथीचे वर्ग बंदच होते. यामुळे सुमारे दोन वर्षे बंद असलेल्या ज्ञानमंदिरांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला आहे.
दरम्यान, राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने शाळा प्रशासनाकडून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची काटेकोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला असून आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना शिक्षणविभागाकडून सर्वच शाळांना देण्यात आल्या आहेत.
पहिल्या दिवशी मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळांमध्ये 1 लाख 10 हजार विद्यार्थ्यांना हे वितरित करण्यात आले. यासाठी 6 लाख 13 हजार पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. तर यावर्षी पहिलीच्या वर्गात 12 हजार 206 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. शालेय पोषण आहाराचे मात्र तीन-तेरा वाजले आहेत. अजूनही शाळांना पोषण आहाराचे साहित्य मिळाले नसल्याने पहिल्या दिवशी मुले जेवणापासून वंचित राहिली, असे असले तरी शिक्षण विभागाने जेवण नसले तरी गोड शिरा करून त्याच्यावर भूक भागवली आहे. अजूनही चार-पाच दिवस पोषण आहाराचे साहित्य येणार नसल्याने आहारापासून विद्यार्थ्यांना वंचितच राहावे लागणार आहे.
शहरालगत असलेल्या नाचणे शाळा क्र.1 मध्ये मुलांसाठी चक्क घोडागाडी आणण्यासाठी ठेवण्यात आली होती. या घोडागाडीतून मुलांनी शाळेत प्रवेश केला. यावेळी मुलांचे औक्षण व पाऊल उमटून स्वागत करण्यात आले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. दत्तात्रय सोपनूर, केंद्रप्रमुख उदय शिंदे, सुगम सावंत, अनुप्रिया आठल्ये, दीपक नागवेकर, संदीप रसाळ, शरदिनी मुळ्ये, अश्विनी पाटील आदी उपस्थित होते.