‘मविआ’च्या नाराज पदाधिकार्यांना विश्वासात घेणार
सावंतवाडी ः पुढारी वृत्तसेवा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेशी गद्दारी करणार्या दीपक केसरकरांचा पराभव हेच आमचे मिशन आहे. ते डोळ्यांसमोर ठेवून आम्ही काम करणार आहोत. स्वगृही परतल्याचा आनंद होणे सहाजिक आहे. मतदारसंघात अचानक घडलेल्या या राजकीय बदलामुळे महाविकास आघाडीतील काही पदाधिकारी नाराज झाल्याचे मला कल्पना आहे. त्यांची नाराजी मी चुकीची म्हणणार नाही; मात्र त्यांची नाराजी दूर करण्यासाठी महाविकास आघाडीतील सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याची पहिली प्रतिक्रिया राजन तेली यांनी शनिवारी दिली.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शनिवारी राजन तेंलीचे सावंतवाडी शिवसेना शाखेत आगमन झाले. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत तेली बोलत होते. ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, जिल्हा उपप्रमुख चंद्रकांत कासार, तालुका समन्वयक मायकल डिसोजा, शब्बीर मणियार, भारती कासार, श्रुतिका दळवी, विशांत तोरस्कर, राजन मुळीक, संजय गवस आदी उपस्थित होते. तेली म्हणाले, अनेक वर्षांनंतर शिवसेनेत पुन्हा परतलो याचा मला आनंद आहे. पक्षाशी व मतदारांशी गद्दारी करणार्या दीपक केसरकरांचा पराभव हे आमचे पहिले उद्दिष्ट आहे. आता मी कोणावर टीका करणार नाही. सावंतवाडी मतदारसंघाचा विकास आणि प्रलंबित प्रश्न डोळ्यांसमोर ठेवून माझे काम असणार आहे. सावंतवाडी मतदारसंघातील रोजगार, आरोग्य आदी प्रश्न मार्गी लागण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. दीपक केसरकरांसारखी मी खोटी आश्वासने देऊन कोणाला फसवणार नाही. प्रत्यक्षात काय करता येईल त्यासाठी माझा पाठपुरावा असणार आहे.
भाजपा कार्यकर्त्यांनी मला मदत करावी
अनेक प्रयत्न करूनही सावंतवाडीत ‘कमळ’ चिन्हावर लढणारा उमेदवार नसणार हे जवळपास निश्चित आहे. खरे तर भाजपचे आणि माझे मिशन एकच आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसह भाजपच्या कार्यकर्त्यांनीही आम्हाला मदत करून बदल घडवून आणावा, असे आवाहन राजन तेली यांनी यावेळी केले. केसरकरांवर सूड उगवण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांना ही नामी संधी असल्याचा दावा यावेळी तेली यांनी केला.
भाजप सोडताना मनाला वेदना
भाजपा सोडताना मनाला अत्यंत वेदना होत आहेत. भाजप नेत्यांनी व भाजप परिवाराने जे प्रेम मला दिले ते मी विसरू शकत नाही. यासाठी मी शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी भाजपच्या नेतृत्वाची व कार्यकर्त्यांची मी माफी मागितली; पण माझा नाईलाज होता. शत-प्रतिशत भाजपसाठी काम करत असताना महायुतीच्या घटक पक्षाने नेहमीच भाजपा पदाधिकार्यांवर अन्याय केला. दोडामार्ग पंचायत समितीत व्हीप नाकारला. ही पंचायत समिती बाबुराव धुरी यांच्याकडे आहे. त्यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे निर्णय मागण्यात आला; मात्र निर्णय होऊ शकला नाही. त्याचबरोबर मळगाव सरपंचावरही अन्याय झाला. घोडेमुख ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा हीच परिस्थिती होती. दीपक केसरकर पालकमंत्री असताना त्यांनी भाजपशासीत ग्रामपंचायतींना निधी दिला नाही. भाजप- शिवसेना युती असतानाही त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचे काम केले, असा आरोप तेली यांनी केला.
...तर केसरकरांना माझा जाहीर पाठिंबा
विकासाच्या मुद्द्यावर मंत्री केसरकर आणि आपणामध्ये एकदा आमने-सामने होऊन जाऊ दे! मंत्री केसरकर यांनी गेल्या पंधरा वर्षांत मतदारसंघात काय विकास केला, ते सांगावे, असे आव्हान राजन तेली यांनी मंत्री दीपक केसरकर यांना दिले. ते म्हणाले, या आमने-सामनेमध्ये केसरकर यांनी आपण विकास केल्याचे सप्रमाण सिद्ध केले, तर आपण केसरकर यांना जाहीर पाठिंबा देऊ.

