

कुडाळ : देशामध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अनेक रस्ते केले, परंतु मुंबई-गोवा महामार्गाचा रस्ता होऊ शकला नाही. याला नितीन गडकरी सुद्धा जबाबदार आहेत. कारण या रस्त्याचे ठेकेदार अनेकदा बदलले गेले आहेत, अनेक ठिकाणी रस्त्याचे काम निकृष्ट केल्यामुळे बहुतांश ठिकाणी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याबाबत सरकारला जाग आणण्यासाठी बुधवार 13 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वा. मुंबई -गोवा हायवेवर हुमरमळा येथे ठाकरे शिवसेनेच्या वतीने चक्का जाम आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे माजी आ. वैभव नाईक यांनी सांगितले.
कुडाळ एमआयडीसी येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत माजी आ. वैभव नाईक बोलत होते. माजी आ. परशुराम उपरकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर,शिवसेना नेते सतीश सावंत, अमरसेन सावंत, युवक जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, कृष्णा धुरी, गंगाराम सडवेलकर, बबन बोभाटे, बाबल गावडे, दीपक गावडे आदी उपस्थित होते.
श्री. नाईक म्हणाले, मुंबई-गोवा महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. खरंतर या महामार्गाचे काम 11 वर्षांपूर्वी सुरू झाले. मात्र सद्यस्थितीत या महामार्गावर जीवघेणे खड्डे पडले आहेत, यामुळे अनेक ठिकाणी अपघात होत आहेत,ज्या उद्देशाने हा चौपदरीकरण महामार्ग बनवण्यात आला, तो अजूनही पूर्ण झालेला नाही, तत्कालीन बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सदर महामार्ग मागील गणेशोत्सवात पूर्ण होईल, असे सांगितले होते; मात्र आता दुसरा गणेशोत्सव आला तरी महामार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. अजूनही महामार्ग पुढील एक वर्ष पूर्ण होणार नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग शिवसेनेच्या वतीने माजी आमदार परशुराम उपरकर, सतीश सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख जिल्हाप्रमुख संदेश पारकर, बाबुराव धुरी, युवा सेना व महिला आघाडीच्या नेतृत्वाखाली 13 ऑगस्टला चक्का जाम आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे श्री.नाईक यांनी सांगितले.
परशुराम उपरकर म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून मंत्री बदलले, तत्कालीन सार्व. बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याच महामार्गावरून फेरफटका मारला आणि खड्डे बुजवले जाणार असे सांगितले, त्यानंतर रवींद्र चव्हाण बांधकाम मंत्री झाले; पण या दोन्ही मंत्र्यांच्या कालावधीत महामार्गाचे काहीच काम झाले नाही, आता पण पालकमंत्री तसेच सांगत आहेत, की खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. खड्डे बुजवीत आहेत ते कशाने बुजवित आहेत? ठेकेदाराला प्रत्येक वर्षी दहा टक्क्याने पैसे दिले जात आहेत. त्या पैशातून सुद्धा ठेकेदार रस्त्यांचे खड्डे चांगल्या पद्धतीने भरत नाहीत ही शोकांतिका आहे. त्या विरोधात सुद्धा हे आमचे आंदोलन असल्याचे श्री. उपरकर यांनी सांगितले.
संदेश पारकर म्हणाले, सिंधुदुर्गातील महामार्ग चौपदरीकरणाची पूर्णतः दुरवस्था झालेली आहे. अनेक ठिकाणी या मार्गावर अपघात होत आहेत. गेली अनेक वर्षे अनेक नेते हा महामार्ग पूर्ण होणार अशी आश्वासने देत आहेत. जिल्हावासीय व ठाकरे शिवसेनेच्या वतीने फार मोठे आंदोलन ओसरगाव येथे टोलच्या संदर्भात तत्कालीन आ. वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली केले होते.
जिल्ह्यातील जनता, व्यापारी, शिवसैनिक एकत्र आले, त्यामुळे टोल थांबला. आजही रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. यावर आवाज उठवण्यासाठी सिंधुदुर्ग शिवसेनेच्या वतीने चक्का जाम आंदोलन हुमरमळा येथे घेत आहोत, या आंदोलनात जिल्हावासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री. पारकर यांनी केले आहे.
सतीश सावंत म्हणाले, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी या महामार्गाची पायाभरणी केली,त्यावेळी त्यांनी सांगितले होते की, शंभर वर्ष या रस्त्याला काहीही होणार नाही; पण गेल्या पंधरा वर्षांतच हा रस्ता अत्यंत निकृष्ट प्रतीचा झालेला आहे. शिवसेनेचे जरी हे आंदोलन असले तरी जिल्ह्यातील व्यापारी, जिल्ह्यातील वाहतूकदार या सर्वांना याचा त्रास होत आहे. या आंदोलनानंतर हायवेच्या प्रशासनाला जाग आली नाही तर पुन्हा एकदा गणेशोत्सव नंतर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असे श्री. सावंत यांनी सांगितले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निरीक्षक बाळ माने यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख पदावरून झालेल्या वादाबाबत उपस्थितांना विचारले असता, तो वाद त्या दिवशी पुरताच होता, उद्याच्या आंदोलनाला बाबुराव धुरी उपस्थित राहणार आहेत, हा जनतेचा प्रश्न आहे. त्यामुळे या आंदोलनात जिल्हावासियांसह सर्व शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असा विश्वास माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, सतीश सावंत यांनी व्यक्त केला.