

सावंतवाडी : सावंतवाडी रेल्वे टर्मिनस हे एकेकाळी कोकण रेल्वेचे महत्त्वाचे टर्मिनस मानले जात होते. मात्र,या टर्मिनसच्या भूमिपूजनाला एक दशकाहून अधिक काळ उलटला असला तरी टर्मिनसची सद्यस्थिती ‘भिजत घोंगडे’ अशीच आहे. राजकीय नेतृत्वाचा अभाव आणि रेल्वे प्रशासनाची दुटप्पी भूमिका, यामुळे सावंतवाडीला सातत्याने दुय्यम वागणूक मिळत असल्याचा आरोप जोर धरू लागला आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे यांनी सावंतवाडी रेल्वे स्थानकासाठी पुढाकार घेतल्याने या विषयाला नव्याने गती मिळाली आहे.
खा. सुळे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना थेट पत्र पाठवून सावंतवाडी टर्मिनसच्या प्रलंबित कामाकडे लक्ष वेधले आहे. तसेच कोविडपूर्वी सावंतवाडी टर्मिनसवर थांबणार्या राजधानी एक्सप्रेस आणि गरीब रथ एक्सप्रेस या गाड्यांचे थांबे पूर्ववत करण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे.
वंदे भारत रेल्वे, टर्मिनसचा विकास तसेच रद्द झालेल्या गाड्यांचे थांबे यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी रेल्वे मंत्रालयाशी कोणताही प्रभावी पत्रव्यवहार केल्याचे दिसत नाही. याउलट, त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यासाठी अनेक पत्रव्यवहार केल्याचे आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे कणकवली स्थानकाला चांगल्या सोयीसुविधा व थांबे मिळाल्याचे बोलले जात आहे.
राणे यांचे राजकीय वजन मोठे असून त्यांना पत्रव्यवहाराचीही गरज लागत नाही, ते केवळ शब्दावर कामे करून घेतात असे अनेकदा म्हटले जाते. मात्र, सावंतवाडीच्या बाबतीत त्यांची ही उदासीनता स्थानिक जनतेला खटकत आहे. सावंतवाडीला प्रभावी राजकीयवाली नसल्यामुळे रेल्वेकडून दुजाभाव मिळत असल्याची भावना स्थानिकांमध्ये आहे. याच कारणामुळे आता खा.सुप्रिया सुळे यांना सावंतवाडीच्या रेल्वे प्रश्नांसाठी स्वतः पुढाकार घ्यावा लागला आहे. यामुळे सावंतवाडीच्या रेल्वे विकासाचे भिजत घोंगडे कधी सुटणार आणि स्थानिक खासदारांकडून यावर कधी ठोस पावले उचलली जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.