मालवण : जागतिक वारसा स्थळाच्या यादीत गौरवपूर्ण स्थान मिळविलेल्या आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची दौलत असणाऱ्या किल्ले सिंधुदुर्गच्या पूर्वेकडील उजव्या बाजूच्या दोन नंबरच्या बुरुजाच्या तटबंदीला पाव्याच्या ठिकाणी तीन मीटर रुंदीचे भगदाड पडल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे.
तटबंदीचे दगडही हल्ल्याने तटबंदी खिळखिळी झाली असून याबाबत शिवप्रेमींमधुन चिंता व्यक्त होत आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या डागडुजीकडे पुरातत्व वि-भागाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी किल्ला रहिवासी, शिवप्रेमी व किल्ले प्रेमींनी केली आहे.
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पूर्वेकडील तटबंदीला भगदाड पडल्याची बाब किल्ला होडी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष व किल्ला रहिवासी मंगेश सावंत यांच्या निदर्शनास आली. याबाबत त्यांनी पुरातत्व विभागाच्या कारभाराबाबत चिंता व्यक्त केली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची सागरी राजधानी असणाऱ्या किल्ले सिंधुदुर्गला यावर्षीच्या पावसाळ्याच्या प्रारंभीच समुद्राच्या लाटांनी जोरदार तडाखा दिला आहे.
किल्ले सिंधुदुर्गच्या पूर्वेकडील उजव्या बाजूच्या दोन नंबरच्या बुरुजाच्या भिंतीला पाव्याच्या ठिकाणी भले मोठे भगदाड पडले आहे. या भगदाडाची सध्याची रुंदी सुमारे तीन मीटर आहे. या भगदाडाच्या आजूबाजूचे दगडाही कोसळण्याच्या स्थितीत असल्याने तटबंदीला मोठा धोका निर्माण झाला आहे. ही बाब सिंधुदुर्ग किल्ल्यातील रहिवासी आणि किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष मंगेश सावंत यांच्या निदर्शनास येताच त्यांनी या भगदाडाची पाहणी केली.
गेल्या काही वर्षात सिंधुदुर्ग किल्ल्याची अवस्था विकट बनत चालली आहे. यापूर्वी समुद्राच्या लाटा ज्या बाजूने धडकतात त्या पश्चिम व दक्षिण भागातील भिंतीना तडे गेले आहेत. काही ठिकाणी छोटी भगदाडेही पडली आहेत. मात्र पुरातत्व विभागाने त्यावर कोणतीही उपाययोजना केलेली नाही.
आतातर लाटांचा मारा न होणाऱ्या पूर्वेकडील बाजूच्या भिंतीचे पाव्याचे दगड कोसळून भागदाड पडल्याने ही चिंतेची बाब असल्याचे मंगेश सावंत यांनी म्हटले आहे. सिंधुदुर्ग किल्ला जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट आहे. असे असताना पुरातत्व विभागाकडून किल्ल्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मंगेश सावंत यांनी केले आहे.
आम्ही गेल्या चार-पाच पिढ्यांपासून सिंधुदुर्ग किल्ल्यात राहत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात उभारलेल्या आणि त्यांच्या सागरी आरमाराची राजधानी असलेल्या या किल्ल्याची आजची अवस्था पाहून आम्हाला वाईट वाटत आहे. पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती ओडवली आहे. हा ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी पुरातत्व विभाग तसेच राज्य व केंद्र शासनाने सिंधुदुर्ग किल्ल्याच्या डागडुजीकडे लक्ष द्यावा, अशी आमची मागणी आहे.
- मंगेश सावंत स्थानिक रहिवासी, किल्ले सिंधुदुर्ग