Sindhudurg Contractors | सिंधुदुर्गातील ठेकेदारांची 500 कोटी रुपयांची बिले थकित
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम कंत्राटदारांनी केलेल्या शासकीय कामांपोटी तब्बल 500 कोटी रुपयांची बिले शासनाकडे थकित आहेत. त्यामुळे कंत्राटदार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर मोठे आर्थिक संकट आले आहे. तरी आपण याबाबत शासनाशी बोलून तोडगा काढावा, अशी मागणी सिंधुदुर्ग बांधकाम कंत्राटदार संघटनेच्या पदाधिकार्यांनी आ. दीपक केसरकर यांच्याकडे केली.
याबाबत संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सार्व. बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषदेमार्फत झालेल्या विकासकामांची ही देयके मार्च 2025 पासून प्रलंबित आहेत. अनेक कंत्राटदारांनी ही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी जमिनी, दागिने तारण ठेवून बँकांकडून कर्ज घेतले आहे. मात्र केलेल्या कामांची बिले न मिळाल्याने त्यांच्या कर्जाचे हप्ते थकले आहेत. बँकांनी त्यांना नोटिसा पाठवल्या असून, यामुळे त्यांचा ‘सिबिल’ स्कोअर खराब झाला आहे. परिणामी, भविष्यात नवीन कर्ज मिळणे कठिण होणार आहे.
या गंभीर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील बांधकाम व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. सिमेंट, वाळू आणि खडी पुरवणार्या व्यापार्यांचीही मोठी देणी थकल्याने कंत्राटदारांवर मानसिक ताण वाढत आहे. या ताणतणावातून सांगली जिल्ह्यातील एका कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची घटना ताजी आहे, सिंधुदुर्गातील कंत्राटदारही असे टोकाचे पाउल उचलण्याची भीती आहे. आता कोकणचा महाउत्सव असलेला गणेशोत्सव तोंडावर आला आहे. तरी गणेश चतुर्थीपूर्वी ठेकेदारांची सर्व थकित बिले अदा करावीत, अशी मागणी कंत्राटदार संघटनेने आ. दीपक केसरकर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. अशोक पवार, अवधूत नार्वेकर, दया परब यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
ठेकेदारांची कुटुंबे आर्थिक संकटात
कामे पूर्ण करण्यासाठी घेतलेल्या कर्जांचे हप्ते थकले
कर्ज वसुलीसाठी बँकाकडून तगादा
ठेकेदार मानसिक तणावात
सांगली येथील घटनेची जिल्ह्यात पुनरावृत्ती घडण्याची भीती

