

रत्नागिरी : सिंधुदुर्गहून रत्नागिरीकडे येणार्या कारला रत्नागिरी-पाली मार्गावरील हातखंबा टॅप रस्त्यावर अपघात झाला. हा अपघात दुपारच्या सुमारास झाला. मार्गफलक न दिसल्याने कार रस्त्यावरील कठड्याला धडकली आणि गाडी रस्त्यावर उलटून जागेवरच पेट घेतला. सुदैवाने, या भीषण अपघातात गाडीतील लहान मुलीसह वडील असे दोघेजण बचावले आहेत.
डॉ. मिहिर मुरलीधर प्रभुदेसाई (वय 39, सिंधुदुर्ग) हे आपल्या ताब्यातील (एमएच-07 क्यू 8032)?कार घेऊन रत्नागिरीत येत होते. हातखंबा - पाली परिसरात रस्त्यावर सुरू असलेल्या कामामुळे मार्गात बदल करण्यात आलेला आहे. मात्र, चालकाला रस्त्यावरील मार्ग बदलाचा सूचना देणारा बोर्ड दिसला नाही. यामुळे ताबा सुटला आणि भरधाव वेगातील गाडी थेट समोर असलेल्या दगडाच्या कठड्यावर जोरदार आदळली.
गाडी जागेवरच उलटली आणि काही क्षणातच गाडीने पेट घेतला. या अपघातात चालक डॉ. मिहिर प्रभुदेसाई जखमी झाले. सोबत असणारी त्यांची मुलगी किरकोळ जखमी झाली.