

सावंतवाडी : पुढारी वृत्तसेवा
अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल साई बसवराज शिंगे व रौनक मोहन राठोड या दोघांनाही नोटीस बजावून पोलिसांनी सोडून दिले, तर अन्य दोन अल्पवयीन मुलांना या प्रकरणात पोलिसांनी सक्त ताकीद दिली आहे. यातील अल्पवयीन मुलीने आपल्यावर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करण्यात आली नसून आम्ही सर्व मित्र आहोत व मी स्वतःच्या मर्जीन त्यांच्यासोबत फिरायला गेली होती, असा जबाब पोलिसांना दिला आहे.
मळगाव येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला मुंबईला फिरायला नेण्याच्या उद्देशाने संशयीत युवक व अन्य तिघांनी तिला घरातून पळवून नेले होते. या प्रकरणी आईने पोलिसांना वेळीच माहिती दिल्याने त्यांना मळगाव रेल्वे स्टेशन येथे पकडून पालकांच्या ताब्यात देण्यात आले होते. मात्र पुन्हा त्याच दिवशी त्या मुलीच्या मित्रांनी घरातून पळवून नेत रेल्वेने रत्नागिरी गाठले होते.
सावंतवाडी पोलिसांनी तातडीने मोहिम राबवून रत्नागिरी पोलिसांच्या मदतीने अल्पवयीन मुलीला व तिच्या मित्रांना तेथून ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिस ठाण्यात साई शिंगे, रौनक राठोड या दोघांवर तसेच अन्य एक अल्पवयीन मुलगा या तिघांवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. यातील एक अल्पवयीन असल्याने त्याला सक्त ताकीद देऊन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले तर दोघांना नोटीस बजावण्यात आली.
अल्पवयीन मुलीने जबाबात आम्ही सर्व मित्र असून आमची गेली कित्येक वर्षांपासून ओळख आह, आमचे घरातीलही एकमेकांना चांगलेच ओळखतात. यापूर्वी देखील मी मित्रांसोबत गोवा व अन्य ठिकाणी फिरायला गेले होते तर आता मी वांद्रे येथे मुंबईला आजीला भेटायला जात असल्याची कल्पना आईला दिली होती व तिनेच मला जाण्यास सांगितले होते, अशी माहिती जबाबात दिली आहे.
दरम्यान आपल्या सोबत मित्रांनी कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य केलेले नाही, असेही तिने पोलिसांना सांगितले. पळवून नेल्याच्या काही तासातच पोलिसांनी मुलीला व तिच्या मित्रांना ताब्यात घेतले त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत अधिक तपास सहा. पो. निरीक्षक पंकज शिंदे करत आहेत.