

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
रत्नागिरी जिल्ह्यात यंदा उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मार्च महिन्यातच काही ठिकाणी पाण्यासाठी महिलांना संघर्ष करावा लागत आहे. विशेषतः रत्नागिरी तालुक्यासह चिपळूण, खेड, लांजा तालुक्यातील कित्येक गावांत पाणी टंचाई भासत आहे. एकीकडे जिल्हा परिषदेचा ग्रामीण पुरवठा विभाग म्हणतो टैंकरसाठी एकही प्रस्ताव नाही.
दुसरीकडे वाड्या, वस्तीत, गावात पाणी टंचाई भासत असल्याचे चित्र असून टँकर सुरू करण्याची मागणी सुरू झाली आहे. दरम्यान, कोकण विभागीय टंचाई कृती आराखडा २०२६ नुसार जिल्ह्यात ३४३ टंचाईग्रस्त गावे, ८१४ बाड्या सद्यस्थितीत असून पाणी टंचाई झळा यंदाच्या वर्षी तीव्र होणार अशी स्थिती आहे.
कोकणात दरवर्षी सर्वाधिक पावसाची नोंद होते. गतवर्षी पावसाची टक्केवारी घसरली. दरवर्षी मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर कोसळणारा वरुणराजा कोकणच्या डोंगरदऱ्या हिरव्यागार करतो. मात्र पावसाळा संपला की अवघ्या काही महिन्यांतच भूमीची तहान बाढू लागते. फेब्रुवारी, मार्च महिन्यातच कोकण विभागात टैंकर धावू लागतात. मार्च महिन्यातच रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेड, लांजा, रत्नागिरी, संगमेश्वरसह अन्य तालुक्यातील काही गावात, वाड्यात पाणीटंचाई भासण्यास सुरुवात झाली आहे.
जलजीवनचे कामे पूर्णच ठप्प झाल्यामुळे महिलांना बागरभर पाण्यासाठी आता लांबचे अंतर कापावे लागणार आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी मागणी, टंचाई बघून जिल्हा प्रशासन, जि.प. ग्रामीण पुरवठा विभागाने तातडीने टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
एप्रिल, मेमध्ये पाणी टंचाई गंभीर
मार्च २०२६ च्या प्रशासनाच्या अहवालानुसार कोकण विभागात यंदा टंचाईची तीव्रता गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत १० टक्क्यांनी वाढणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याची २०२६ मधील पाणी टंचाईची स्थिती चिंताजनक बनत आहे. त्यामुळे येत्या एप्रिल, मे महिन्यात पाणी टंचाई भासणार असून वाड्या, गावात मोठ्या प्रमाणात टँकरने पाणी पुरवठा करण्याची स्थिती निर्माण होऊ शकते, असे अहवालातून स्पष्ट होते.