

Mumbai-Goa Highway Farmer Protest
नांदगाव: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि.२३) सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली तालुक्यातील नांदगाव ओव्हर ब्रीज नजीक पेट्रोलपंप समोर ‘चक्का जाम’ आंदोलन छेडण्यात आले.
यावेळेस राजू शेट्टीसह शेतकऱ्यांनी महामार्गाच्या दोन्ही लेनवर ठिय्या मांडत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. यावेळेस शेतकरी सुध्दा आक्रमक होत आपल्या मागण्यांसाठी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
या आंदोलनात राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने माजी आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, आंबा उत्पादक संघाचे काका ढोके, उत्तम लोके याच्यासह शेकडो शेतकरी महामार्गावर उतरले.
यापूर्वीच्या आक्रोश मोर्चात राजू शेट्टी यांनी आंबा बागायतदारांना हेक्टरी ५ लाख आणि काजू बागायतदारांना हेक्टरी ३ लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी सकारात्मक आश्वासन दिले होते, मात्र दहा दिवस उलटूनही ठोस निर्णय न झाल्याने आज मोर्चा काढत चक्का जाम केला. यावेळेस खबरदारी म्हणून अवजड वाहने तळेरे व हुंबरट येथे आधीच रोखण्यात आली होती.
तर पोलीस प्रशासनाने मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक बदलाचे पत्र काढून विविध मार्गात बदल केल्यामुळे मोर्चेकऱ्यांनीही नांदगाव येथून आपला निर्णय बदलून हुंबरट येथे महामार्ग रोखण्यासाठी सात ते आठ कि.मी.पायी चालत जात गेले.तत्पूर्वी नांदगाव येथे प्रशासनाच्या वतीने प्रातांधिकारी जगदीश कातकर व तहसीलदार दिक्षांत देशपांडे यानी भेट घेतली. मात्र, मागण्यां मान्य होईपर्यंत चक्का जामचा ईशारा देण्यात येत उपस्थित शेतक-यांना राजू शेट्टीसह इतर वक्त्यांनी मार्गदर्शन करत पुढील आंदोलनाची दिशा ठरवत नांदगाव येथून रवाना झाले.