

सावंतवाडी : खा. राहुल गांधी यांचा मतचोरीचा आरोप हा खोटारडेपणा आहे. लोकसभेची निवडणूक होत असताना मतदार यादीवर यांच्या बुथ प्रमुखांनी आक्षेप घेतला नाही, मतदान मशीन सील होताना आक्षेप घेतला नाही. परंतु तसे न करता विरोध ‘मत चोरी’ची खोटी बोंब मारत असल्याची टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. मुंबई महानगरपालिका महायुती प्रचंड बहुमताने जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सावंतवाडी येथे आ. दीपक केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्य काळामध्ये पाच महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. याचा पाच कोटी परिवारांना फायदा झाला आणि याचा फायदा आम्हाला म्हणून 51 टक्के मतदान भारतीय जनता पार्टीला मिळाल, असा दावा मंत्री बावनकुळे यांनी केला.
आ. दीपक केसरकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, सिंधुदुर्ग बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुका प्रमुख बबन राणे, गणेश प्रसाद गवस, नितीन मांजरेकर, बाबू कुडतरकर आदी उपस्थित होते.
‘केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र’ हे डबल इंजिन सरकार आहे. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर आम्ही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर करण्याचे ठरवले आहे. लोकांना विकास हवा आहे. त्यामुळे मोठे बहुमत मुंबई महापालिकेमध्ये महायुतीला मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कितीही भाषा वाद लावले तरी जनता विकासासाठी मत देईल, असे ते म्हणाले.
महायुतीत कोणताही मतभेद नाहीत. भाजपमध्ये काँग्रेसची मंडळी तर शिंदे सेनेकडे उबाठाची तर अजित पवार यांच्याकडे शरद पवार गटाचे कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. महायुतीतील एकमेकांच्या पक्षातील कार्यकर्ते घेऊ नये, अशी भूमिका समन्वय समितीने घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याबाबत विचारले असता, ते म्हणाले प्रत्येकाची लाईन ठरलेली आहे. भाजपा मोठा पक्ष म्हणून त्यांची ही लाईन ठरलेली आहे. त्यामुळे ही लाईन क्रॉस होणार नाही याची काळजी महायुतीतील प्रत्येक पक्षाचे प्रमुख घेत आहेत.
ठाकरे बंधू एकत्र आल्याने मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये कोणताही परिणाम होणार नाही, फरक पडणार नाही. परिवार एक होत असेल तर त्यांचे आम्ही स्वागत करतो आणि शुभेच्छा देतो असे ते म्हणाले. रायगड जिल्हा पालकमंत्री पदावरून कोणतीही नाराजी नाही. याबाबत एकत्र बसून समन्वय करायचा आहे. हा वाद अटीतटीचा नसल्याचे ते म्हणाले. ध्वजारोहणाचा निर्णय जिथे पालकमंत्री नाही तिथे कुणीतरी जावे अशा प्रकारचा आहे. एका मंत्राकडे दोन ठिकाणी ध्वजारोहण करता येणे शक्य नसल्यामुळे यात कोणता वाद नसल्याचे ते म्हणाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आठ नगरपरिषदांच्या निवडणुका आहेत, म्हणून विरोधकांनी आत्ताच मतदार यादी चेक करून घ्यावी, नाहीतर उद्या म्हणायचे मतांची चोरी झाली. राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मतदार यादी चेक करण्याचे आदेश काढावेत, असा टोला त्यांनी हाणला.