

मडुरा : महाराष्ट्रातील तब्बल २७ हजार ९५१ ग्रामपंचायतींपैकी केवळ १०२ ग्रामपंचायतींची 'बालस्नेही पंचायत' म्हणून निवड करण्यात आली असून त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींनी मानाचे स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे सावंतवाडी तालुक्यातील पाडलोस ग्रामपंचायतीने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवत राज्यस्तरावरही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मडुरा ग्रामपंचायतीने द्वितीय, तर वैभववाडी तालुक्यातील कुसूर ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक मिळविला आहे.
बालस्नेही गाव म्हणून राज्यस्तरावर निवड झाल्यानंतर यशदा पुणे तसेच युनिसेफ आणि बालहक्क आयोगमार्फत बालसभेचे पाडलोस ग्रामपंचायत सभागृहात आयोजन करण्यात आले होते. मार्गदर्शन करण्यासाठी यशदा पुणेचे मास्टर ट्रेनर नारायण परब उपस्थित होते. सरपंच सलोनी पेडणेकर, उपसरपंच राजू शेटकर, ओम गणेश बालसभा अध्यक्ष सानिका गावडे, सचिव गौतमी केणी आर्दीसह मान्यवर उपस्थित होते.
राज्यात १०२ ग्रामपंचायतीत पाडलोस ग्रामपंचायतीने स्थान मिळवणे हे मोठे यश आहे व तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे. सिंधुदुर्गात प्रथम क्रमांक मिळविण्यात ओम गणेश बालसभा पदाधिकारी व पालकांचे महत्त्वाचे योगदान आहे.
- श्रीधर पाटील, तहसीलदार, सावंतवाडी