सावंतवाडी : चौकुळ गावाचा गेली कित्येक वर्षे रखडलेला कबुलायतदार गावकर जमीन प्रश्न आता सुटला आहे. आंबोलीत स्थानिक आणि बाहेरून आलेल्यांची वहिवाट असल्यामुळे त्याबाबत लवकरच सर्व्हे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तेथील जमिनींची आरक्षण प्रक्रिया सुरू झाली असून, राहिलेल्या वनजमिनीबाबतदेखील आचारसंहितेपूर्वी निर्णय घेतला जाऊन त्या जमिनीचे गावकर्यांच्या सहमतीने समान वाटप होईल, असे आश्वासन मंत्री दीपक केसरकर यांनी दिले. मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्नही येत्या दोन दिवसांत सुटेल, असे केसरकर यांनी नमूद केले.
मंत्री केसरकर यांनी आपल्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी राजन पोकळे उपस्थित होते. केसरकर म्हणाले, चौकुळ कबुलायतदार गावकर जमीनप्रश्नी स्थानिक ग्रामस्थांची कमिटी करण्यात आली आहे. कमिटी अध्यक्ष शशिकांत गावडे यांच्या म्हणण्यनुसार जमिनींचे समान वाटप करण्याचे ठरवण्यात आले असून, त्यांनी दिलेली माहिती अंतिम करण्यात आली आहे. आंबोली येथे स्थानिक आणि बाहेरून आलेल्यांची वहिवाट असल्यामुळे त्याचाही लवकरच सर्व्हे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आरक्षणानुसार प्रक्रिया राबविली जाणार असून आंबोली गावचा प्रश्न सुटण्यासाठी व इतर वनजमिनीचे वाटप आचारसंहितेपूर्वी होण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे केसरकर म्हणाले.
चौकुळचा कबुलायतदार गावकर प्रश्न आता सुटला आहे. त्याप्रमाणे आंबोली, गेळे गावाचा प्रश्न देखील सुटेल. माझ्या मतदारसंघातील रखडलेले बरेचसे प्रश्न मी मार्गी लावले आहेत. त्यातील मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचा प्रश्नही सुटण्याच्या मार्गावर आहे.हे हॉस्पिटल मीच मंजूर केले होते. त्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. दोन्ही वकिलांची कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेेऊन तोही प्रश्न येत्या दोन दिवसात निकाली लागेल. तिलारी पुनर्वसन प्रश्नी शासनाने वनटाईम सेटलमेंटचा निर्णय घेतला आहे. जमीन मालकांची वनटाईम सेटलमेंट करुन घेतली असून त्यांना ते हक्कही प्राप्त झाले आहेत. त्यातील जे काही लोक राहिले आहेत त्यांनाही यात सामावून घेतले जाईल. सावंतवाडी नूतन एसटी स्टँड उभारण्याबाबत मी निधी मंजूर केला होता, परंतु एसटी महामंडळ व ठेकेदार यांच्या वादात हे काम रखडले. त्यात कोरोनामुळे या कामाला आणखी विलंब झाला. आता या ठिकाणी अत्याधुनिक एसटी स्टँड उभारण्यात येणार आहे. कणकवली व सावंतवाडी ही दोन्ही स्थानके हायवेवरील असल्यामुळे त्यांना नवा लूक दिला जाईल. याबाबत महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांच्याशी आपली चर्चा झाली असून लवकरच या कामाचे पुन्हा टेंडर निघेल असे केसरकर यांनी सांगितले.
तिलारी येथे पर्यटनावर आधारित मोठा प्रकल्प आणला आहे. कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक त्याठिकाणी करण्यात आली असून एम.टी.डी.सी. ने विलंब केल्यामुळे काही कामांना विलंब झाला, परंतु हा प्रकल्प चालविण्यास देण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा घेतली जावी. जो जिंकेल त्या कंपनीला हे काम दिले जावे. जिल्हा परिषदेला हे तात्पुरते टेंडर काढण्यास सांगितले आहे. या प्रकल्पात वॉटर स्पोर्ट्स, डबलडेकर बोट, हाऊस बोट यासाठी सबसिडी मिळणार आहे. तर मोठ्या बोटींसाठी एक कोटी रूपयापर्यंत शासन सबसिडी देत आहे. या प्रकल्पात लोकांनी सहभागी झाले पाहिजे.जिल्ह्यात किनारपट्टीजवळ ‘ब्रेड अँड ब्रेकफास्ट’ योजना राबविली जात असून मोपा एअरपोर्टजवळ या योजनेला भरपूर संधी आहे. त्या ठिकाणी हॉटेल उभारण्यास देखील परवानगी देत आहोत. लोकांनी याचा फायदा घ्यावा, असे केसरकर म्हणाले.
दोडामार्ग- आडाळी एमआयडीसी येथे आपण नुकतीच भेट दिली. तिथे नवीन कंपन्या गुंतवणुकीसाठी येणार आहेत. 250 कोटी रुपयांची गुंतवणूक करणारी अॅल्युमिनियम टिन तयार करणारी कंपनी येऊ घातली असून त्याचे भूमिपूजन लकरच होईल. ज्या ज्या लोकांनी यांचे श्रेय घेतले त्यांनीही या कार्यक्रमाला यावे असा टोला केसरकर यांनी लगावला. मला मंत्रीपदाचा मोह नाही, परंतु कोकणाचा विकास झाला पाहिजे हेच ध्येय आहे. काही लोक कमी दरात जमिनी घेतात आणि मोठ्या किंमतीत विकतात याला विकास म्हणता येणार नाही. येथील शेतकरी, जमीन मालक यांच्या पाठीशी मी ठामपणे राहणार असल्याचे केसरकर म्हणाले. शहरातील एका कंपनीत कामास असलेल्या ज्या मुला- मुलींचे जॉब गेले आहेत. ती सर्व माझ्याच मतदारसंघातील तरुण -तरुणी आहेत. त्यांच्या पगाराचे पैसे लवकरच मिळवून देणार असून त्यांना नवीन कंपनीमध्ये पुन्हा जॉब मिळवून देऊ, असे आश्वासन केसरकर यांनी दिले.
महाराष्ट्रात सर्वत्र युतीचा धर्म पाळला जात आहे. तो सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील पाळला जावा, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. जे लोक युतीचा धर्म मोडत आहेत त्यांच्यावर त्यांच्या पक्षाने काय कारवाई करावी हे त्यांनी ठरवावे. मी मात्र युती धर्म पाळणार असे केसरकर यांनी सांगत कणकवली येथे युती धर्म न पाळणार्यांवर कारवाई करण्याचे पत्र मी दिले आहे. याच मतदारसंघात मी अन्यायाविरोधात उठाव केला होता. त्यावेळी सर्व जनता माझ्या पाठीशी राहिली होती हा इतिहास आहे. त्यामुळे मला पुन्हा असा लढा उभारण्यास भाग पाडू नका. असे केल्यास त्यांना त्यांची जागा दाखवेन, असा सज्जड इशाराही ना. केसरकर यांनी दिला.