

कासार्डे ः दहावी- बारावी बोर्ड परीक्षेत कॉपी होणारच नाही, असे नियोजन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्य. शिक्षण मंडळाने केले आहे. त्यासाठी लेखी परीक्षेपूर्वी होणाऱ्या प्रात्यक्षिक परीक्षेतील बाह्य परीक्षकांची आता अदलाबदल केली जाणार आहे. खासगी स्वयंअर्थसहाय्यिता शाळांवरील शिक्षक अनुदानित शाळांमध्ये आणि तेथील शिक्षक स्वयंअर्थसहायिता शाळांमध्ये बाह्यपरीक्षक म्हणून नेमण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे.
इयत्ता बारावी विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या दरम्यान होणार आहे. त्यानंतर 10 फेब्रुवारीपासून लेखी परीक्षा सुरू होईल. दुसरीकडे, इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक तथा तोंडी परीक्षा 2 ते 18 फेब्रुवारीपर्यंत पार पडेल. त्यानंतर 20 फेब्रुवारीपासून लेखी परीक्षा सुरू होणार आहे. दरम्यान, बोर्ड परीक्षेवेळी कॉपी केसेस किंवा गैरप्रकार आढळल्यास आता त्या परीक्षा केंद्रांची मान्यता कायमची रद्द केली जाणार आहे. केंद्राला पक्के वॉल कंपाउंड, स्वच्छतागृह, पाण्याची सोय, प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे अशा बाबींचा त्यात समावेश आहे.
एखाद्या केंद्राचे वॉल कंपाऊंड पडलेले असल्यास त्या ठिकाणी लोखंडी जाळी मारायला सांगण्यात आले आहे. आता प्रात्यक्षिक परीक्षेपूर्वी 7 जानेवारीला बाह्य परीक्षकांचा उद्बोधन वर्ग घेतला जाणार आहे. त्यावेळी बाह्य परीक्षकांनी प्रात्यक्षिकावेळी कोणत्या बाबी तपासायच्या याबद्दल मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षेवेळी प्रत्येक जिल्ह्यातील किमान 10 टक्के शाळांना शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांची पथके भेटी देऊन प्रत्यक्षात तोंडी तथा प्रात्यक्षिक परीक्षेची तपासणी करतील, असेही बोर्डाने नियोजन केले आहे.