

कणकवली - इराण-इस्रायल युद्धात इराकच्या जरबो बोटीवर होर्मुझ समुद्रधुनीत अडकलेल्या महाराष्ट्र राज्यातील ११ कर्मचाऱ्यांना भाजप नेते खा. नारायण राणे यांच्या प्रयत्नातून सुखरूप भारतात घरी आले. सिंधुदुर्गातील संबंधित युवकाने खा. राणे यांची कणकवलीत भेट घेऊन आभार व्यक्त केले.
या बोटीवर मालवण तालुक्यातील दांडी येथील प्रतीक प्रवीण खोचरेकर हा 23 वर्षे युवक अडकला असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी खा. नारायण राणे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना लक्षात आणून दिली होती. त्यानंतर या घटनेचे गांभीर्य ओळखून खा. राणे यांनी भारतीय नाविक सेना युनियनचे जनरल सेक्रेटरी सुरेश साळसकर यांच्यावर ही जबाबदारी सोपवून प्रत्यक्ष त्या कंपनीतील अधिकाऱ्यांबरोबर आणि इराण, इराक आणि इस्रायल येथील अधिकाऱ्यांशी चर्चा करून भारतीय दूतावासाशी संपर्क साधून या सर्व अकरा कर्मचाऱ्यांना देशात आणले.
शुक्रवारी प्रतीक खोचरेकर या युवकाने खा. नारायण राणे यांची कणकवली येथे भेट घेऊन आभार व्यक्त केले. घटनेचे गांभीर्य ओळखून खा. नारायण राणे यांनी दिल्ली स्तरावर चक्र फिरवली, भारतीय नाविक युनियनचे पदाधिकारी यांना या कामाची जबाबदारी दिली आणि स्वतः प्रमुख अधिकाऱ्यांसह दोन्ही देशांतील प्रमुख नेत्यांशी बोलून चर्चा करून या अडकलेल्या कर्मचाऱ्यांना सुखरूप मायदेशी आणले. याबद्दल खा. नारायण राणे यांचे सर्व कुटुंबीयांकडून आभार व्यक्त केले जात आहेत.