मुंबई : मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर राज्य सरकार त्याच जागी नवीन पुतळा उभारणार आहे. हा पुतळा उभारण्यासाठी राज्य सरकारने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली नऊजणांची समिती स्थापन केली आहे. समितीत नौदल अधिकाऱ्यांसह आयआयटी तज्ज्ञ, वास्तू विशारद, इतिहासकार आदींचा समावेश आहे. या समितीला विहित कालमर्यादा न देता सत्वर काम हाती घेऊन तत्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्यावर समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. समितीच्या सदस्य सचिवपदी सार्वजनिक बांधकाम विभागाचे (रस्ते) सचिव सदाशिव साळुंखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समिती सदस्य म्हणून नौदलाचे प्रतिनिधी कमोडोर एम. दोराईबाबू, आयआयटी तज्ज्ञ प्रा. जांगीड, प्रा. परिदा, जे. जे. स्कूल ऑफ आर्किटेक्चर मुंबईचे संचालक राजीव मिश्रा, सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज आणि मराठा आरमाराचे अभ्यासक राजे रघुजी आंग्रे यांचा समावेश करण्यात आला आहे. तर ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार है समितीचे विशेष निमंत्रित आहेत.
शिवाय इतर निमंत्रितांनाही स्थान देण्यात आले आहे. या समितीवर किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्याने उभारण्याच्या कामाचे स्वरूप, संकल्पन आणि कार्यपद्धती निश्चितीसाठी शिफारस करण्याची जबाबदारी सोपविण्यात आल आहे. या समितीला विहित कालमर्यादा न देता तत्काळ अहवाल सादर करण्याच्य सूचना देण्यात आल्या आहेत.
शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी भारतीय नौदलाचे तज्ज्ञ कमोडोर पवन धिंगरा यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची समिती नेमण्यात आली आहे. या समितीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकाम) संजय दशपुते, माजी मुख्य अभियंता व एमएसआयडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक विकास रामगुडे, आयआयटी तज्ज्ञ प्रा. जांगीड, प्रा. परिदा यांचा समावेश आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत झालेल्या दुर्घटनेची नेमकी कारणमीमांसा शोधणे आणि दुर्घटनेमागील दोष निश्चित करण्याची जबाबदारी या समितीवर सोपविण्यात आली आहे.