

दोडामार्ग : तिलारी खोर्यातील हत्तींचा मोर्चा आता दोडामार्ग तालुक्यातील घोटगे पंचक्रोशीकडे वळला आहे. हत्तींनी घोटगे गावातील शेतकर्यांच्या बागायतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. शेतकरी सतीश दळवी यांच्या काजू, नारळ व केळीच्या बागा हत्तींनी अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकल्या. यात त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
आता पर्यंत तळकट पंचक्रोशीत वावरणारे हत्ती महिनाभरापूर्वी तिलारी खोर्यात दाखल झाले. पंचक्रोशीतील शेती, बागायतींमध्ये धुडगूस घालत या हत्तींनी शेतकर्यांचे अतोनात नुकसान केले. आता या हत्तींनी आपला मोर्चा घोटगे गावाकडे वळविला आहे. हत्तींच्या या आगमनामुळे घोटगे, घोटगेवाडी तसेच परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. रविवारी रात्री घोटगे गावात दाखल हत्तींनी येथील शेतकर्यांच्या नारळ, केळी, सुपारी, बांबू आणि काजू बागायतींमध्ये अक्षरशः हैदोस घातला.
मोठमोठाली झाडे उन्मळून व मोडून टाकली. यामध्ये शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. स्थानिक शेतकर्यांनी वन विभागाकडे तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. हे वन्य हत्ती कधी परत जाणार आणि या त्रासातून आम्हाला मुक्ती कधी मिळणार? असा संतप्त सवाल शेतकरी करत आहेत.