

कणकवली : ‘गोविंदा आला रे आला... आला गोविंदा... गोंविदा रे गोपाळा... यशोदेच्या तान्ह्या बाळा... एक दोन तीन चार... सिंधुदुर्गची पोरं हुश्शार...’ अशा एकाहून एक गाण्यांच्या तालावर थिरकत आणि डीजेच्या तालावर नाचत मोठ्या उत्साहात शनिवार दुपारपासून रात्री उशिरापर्यंत दहीकाला अर्थात दहीहंडी उत्सव सिंधुदुर्गात उत्साहात साजरा करण्यात आला.
जिल्ह्यात काही ठिकाणी एक लाखाहून अधिक रकमेच्या दहीहंडींचे आयोजन करण्यात आले होते. थरावर थरांचे मनोरे रचत गोविंदांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. रात्री उशिरापर्यंत हा दहीहंडीचा माहोल सुरू होता.
शुक्रवारी श्रीकृष्ण जन्माष्टमी भक्तिमय वातावरणात साजरी झाली तर शनिवारी दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा झाला. सकाळपासूनच बालगोपाळ आणि गोविंदांनी दहीहंडीची तयारी केली होती. प्रमुख नाका, चौक आणि रस्त्यांवर दहीहंड्या बांधण्यात आल्या होत्या. साधारणपणे शनिवारी दुपारपासून गोविंदांची एकाहून एक गाणी वाजवत डीजेच्या तालावर फिरकत दहीहंडीचा माहोल सुरू झाला. या दहीहंड्या उत्सव पाहण्यासाठी ठिकठिकणी नागरिकांनी गर्दी केली होती.
कणकवली बाजारपेठेसह तालुक्याच्या ठिकाणी परंपरेप्रमाणे दहीहंड्या साजर्या करण्यात आल्या तर जिल्हाभरातही असेच उत्साहाचे वातावरण होते. अनेक ठिकाणी डीजेच्या तालावर दहीहंड्या फोडण्यासाठी उंचच उंच मानवी मनोरे लावण्यात आले होते. कासार्डेमध्ये प्रमोद जठार मित्रमंडळाच्या वतीने सुमारे एक लाखाच्या बक्षिसाची दहीहंडी उभारण्यात आली होती. यामध्ये जय हनुमान गोविंदा पथक, खडपेवाडी राजापूर यांनी सात थरांची विजयी सलामी दिली.
विशेष म्हणजे दहीहंडी उत्सवाच्या दिवसभर पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या. त्यामुळे बालगोपाळांचा आनंद आणखीनच द्विगुणीत झाला. छोट्या छोट्या दहीहंड्या सायंकाळपर्यंत फोडण्यात आल्या तर मोठ्या बक्षिसांच्या दहीहंड्या रात्री उशिरा फोडण्यात आल्या. दरवर्षीच्या तुलनेत यंदा मोठ्या रकमेच्या दहीहंड्यांची संख्या कमी होती. मात्र तरीही बालगोपाळ आणि गोविंदांचा उत्साह तेवढाच होता.