

कुडाळ : प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून करण्यात आलेल्या मालवण तालुक्यातील चव्हाटा-आंबेरी मार्गावर (ग्रा. मा. 407) मोठे खड्डे पडून हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. याबाबत कुडाळ येथील पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या कार्यालयासमोर ग्रामस्थांनी सोमवारी उपोषण छेडले. याची दखल घेत अखेर चार दिवसात रस्ता दुरुस्त करून देतो, असे लेखी पत्र कार्यकारी अभियंता धनंजय भोसले यांनी ग्रामस्थांना दिले.त्यानंतर ग्रामस्थांनी उपोषण तुर्त मागे घेतले. अभियंत्यांनी दिलेल्या शब्द पाळला नाही तर ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य राजीनामा देणार असल्याचा निर्वाणीचा इशारा सरपंच मनोज डिचोलकर यांनी दिला. विशेष म्हणजे उपोषणाला बसलेली सर्व मंडळी सत्ताधारी भाजपा पक्षातीलच होती.‘आमचे सरकार, आमचेच मुख्यमंत्री’ असून सुद्धा आमच्यावर ही वेळ आली असल्याची खंत उपोषणकर्त्या आंबेरी ग्रामस्थांनी बोलून दाखवली.
मालवण तालुक्यातील आंबेरी येथील चव्हाटा ते आंबेरी हा (ग्रा.म. 407) मार्ग प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून करण्यात आला. या कामाला अवघे काही महिनेच होत नाहीत तो मार्गावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. रस्त्यावरून वाहतूक करताना ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. रस्त्याच्या या दुरवस्थेमुळे गावातील एसटी फेरी देखील बंद झाल्या होत्या.
रस्त्याच्या या दुरवस्थेबाबत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कुडाळ कार्यालयाकडे ग्रामस्थ, सरपंच यांनी वारंवार लेखी, तोंडी तक्रार केली होती. पण कार्यालयाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. आता पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे पाऊस अधिक वाढण्याच्या आधी रस्ता दुरुस्त करावा, असे निवेदन ग्रामसडकच्या कार्यालयाला देण्यात आले.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कार्यालयाचे कार्यकारी अभियंता धनंजय भोसले यांनी सरपंच आणि ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले. येत्या चार दिवसात खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त करून देतो असे लेखी आश्वासन त्यांनी दिले. त्या पत्राचे वाचन सरपंच मनोज डिचोलकर यांनी केले. त्यांनतर ग्रामस्थानी हे उपोषण तुर्त स्थगित केले. जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. सरपंच मनोज डिचोलकर, उपसरपंच रवींद्र परब, ग्रामपंचायत सदस्य कमलेश वाक्कर, गणेश डिचोलकर, पूर्वा मुसळे, मिलन सामंत, वृंदा केळुसकर, माजी सरपंच केशव नांदोसकर, शंकर खोत, बाळू मुसळे, प्रवीण आंबेरकर, शिवराम आंबेरकर, निलेश मुसळे, जगदीश वाक्कर, प्रवीण वाक्कर, अमित डिचोलकर, समीर मांजरेकर, समीर मुणगेकर, महेंद्र केळुसकर, आनंद आंबेरकर, विशाल परुळेकर, संदीप कुलकर्णी, सतीश वाइरकर, बाबा परब, रवींद्र सामंत, संदेश मांजरेकर आदी उपस्थित होते.
केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. आंबेरी ग्रामपंचायीवर भाजपच्या विचारांना माननार्या सदस्यांची सत्ता आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काम करत आहेत. गेल्या निवडणुकीत आंबेरी गावातून 85 टक्के मतदान भाजपला केले आहे. तरी आमच्या नशिबी रस्ता नाही? आमच्या मागण्यांची दखल संबंधित कार्यालयाकडून का घेतली जात नाही? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी करत येत्या चार दिवसात रस्त्यावरील खड्ड्यांचे काम झाले नाही, तर त्या खड्ड्यातच बसून आम्ही उपोषण करू व सरपंचासह सर्वजण राजीनामा देवू, असा निर्वाणीचा इशारा सरपंच श्री. डिचोलकर यांनी दिला आहे.