

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात रत्नागिरी जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या असून जिल्ह्यात रत्नागिरी, खेड, चिपळूण, मंडणगड तालुक्यांतील १६ गावांतील ३५ वाड्यांमध्ये १ शासकीय व ९ खासगी टैंकर अशा १० टैंकरनी पाणीपुरवठा सुरू आहे. १८१ फेऱ्या होत आहेत. यात सर्वाधिक ७ टैंकर रत्नागिरी तालुक्यात सुरू आहेत.
पाणी टंचाईने १८ हजार ७१ लोक बाधित असून कोकण पाणीटंचाईमुळे होरपळत आहे. मे महिन्यामध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद होते. मात्र जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहता पावसाचे पाणी जमिनीत मुरून नद्या, नाल्यातून समुद्राला जाऊन मिळते.
मात्र पाणी साठवण्यासाठी शासकीय स्तरावरकरण्यात येणार प्रयत्न अपुरे ठरत आहेत. दरवर्षी कोट्यवधी रुपये पाणीपुरवठा योजनांवर खर्च करूनही जिल्ह्याला पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.
रत्नागिरी तालुक्यातील १६ गावांतील ३५ वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई उद्भवली असून त्यांना १० टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. या गावे, वाड्यांना पाणीपुरवठा... रत्नागिरी-शिरगाव राधाकृष्णनगर तिबंडेवाडी, स्वरूपानंदनगर अजमेरीनगर, खालची राजनगर, प्रशांत नगर, सडामिऱ्या-चौसोपीवाडी, गवाणवाडी, मधलावठार, खालचावठार, मिऱ्याबंदर, खालगाव-बौद्धवाडीमधील गोताडवाडी,
जाकादेवी बाजारपेठ मेर्वी-वरची म्हादवेवाडी, मिरजोळे-मधलीवाडी, भक्ती कुंज, एलिना, स्मित प्रभा, मंडणगड तालुक्यातील वाल्मिकी नगर, कोंडगाव, खेड-बोरटोक, धनगरवाडी, वरची धनगरवाडी, चिपळूण-डेरवण-धनगरवाडी, चव्हाणवाडी, कुडप-धनगरवाडी, कातळवाडी, अनारी-धनगरवाडी, कोंडमळा-धनगरवाडी, नारळेवाडी, राडेवाडी, अडरे-धनगरवाडी, सावर्डे-धनगरवाडी, टेरव-धनगरवाडी या गावे व वाड्यांना पाणीपुरवठा सुरू केला आहे.