

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
एप्रिल महिना उजाडतानाच रत्नागिरी जिल्ह्यात पाण्याची टंचाई तीव्र झाली आहे. रत्नागिरी तालुक्यातील नाचणे, मिऱ्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत जिल्ह्यात पहिल्यांदाच दोन टैंकरनी पाणीपुरवठा सुरू केल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने मंगळवारी देण्यात आली.
चिपळूण, खेड, राजापूर, लांजा तालुक्यातही टंचाई सुरू असून टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे. तीव्र उन्हाळ्याची सुरुवात होताच जिल्ह्यातील वाड्या, वस्ती, गावात विशेषतः खेड, चिपळूण, लांजा, रत्नागिरी तालुक्यात टंचाई भासत आहे.
गावकऱ्यांकडून टँकरने पाणी पुरवठ्याची मागणी होत होती. अखेर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पुरवठा विभागाच्या प्रशासनास जाग आली असून मिऱ्या, नाचणे या ग्रामपंचायतीत दोन टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे.
एकीकडे निधीअभावी जलजीवनची कामे ठप्प झाली आहेत, तर पाण्यासाठी महिलांना मोठी कसरत करावी लागत आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील ३४३ गावे, ८१४ वाड्या टंचाईग्रस्त असून यंदाच्या वर्षी टंचाईची तीव्रता वाढणार असल्याचे कोकण विभागीय टंचाई कृती आराखड्यात सांगितले आहे. त्यामुळे मागणी आहे तेथे टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.