

रत्नागिरीः पुढारी वृत्तसेवा
कोकणकरांसाठी आनंदाची वार्ता असून रत्नागिरी विभागात अखेर राजमाता जिजाऊ बसेसचे आगमन झाले आहे. आज सोमवार दि. 25 मेपासून जिल्हांतर्गत, कोल्हापूर, मिरजसह इतर लांब पल्ल्याच्या अंतरावर प्रवासाला सुरूवात झाली आहे. रत्नागिरी आगारासाठी तब्बल 18 बसेस आल्या आहेत.
भगव्या रंगाची बस प्रवाशांच्या पसंतीस पडली असून वाढत्या गर्दीमुळे उभे रहावे लागत होते मात्र नव्या बसेसमुळे अडचण दूर होणार आहे, अशा प्रतिक्रीया प्रवाशांनी दिल्या आहेत. रत्नागिरी विभागात बसेसची कमतरता भासत असल्यामुळे वेळापत्रक बिघडले होते. त्यामुळे प्रवा शांकडून संताप व्यक्त होत होता.
तरीही आहे त्या बसेसमध्ये वाहतूक व्यवस्था चांगल्या पध्दतीने सुरू होती. रत्नागिरी विभागाचे विभाग नियंत्रक आश्वजीत जानराव यांनी नव्या राजमाता जिजाऊ बसेससाठी महामंडळाला प्रस्ताव पाठवला होता. अखेर महामंडळाने तब्बल 18 नव्या एसटी बसेस रत्नागिरी विभागासाठी मंजूर केल्या असून त्या बसेस रत्नागिरी आगारात दाखल झाल्या आहेत.
सकाळी हार घालून नव्या वाहनांचे शुभारंभ करण्यात आले. नव्या बसेस कोल्हापूर, मिरजसह जिल्हांतर्गत रस्त्यावरही धावू लागल्या आहेत. टप्प्याटप्प्याने आणखीन बसेस येणार आहेत. त्यामुळे रत्नागिरी विभागाची वाहतूक सुरळीत होईल, गाड्याही वेळेत येतील, असेही सांगण्यात आले.
पहिल्याच दिवशी या मार्गावर धावली बस
राजमाता जिजाऊ बसेस पहिल्याच दिवशी कोल्हापूर, पानवल, गडहिंग्लज, शिराळा, मिरज, नृसिंहवाडी, जयगड, पावस इ. मार्गावर बसेस धावल्या आहेत. अत्याधुनिक बसमध्ये प्रवास करून प्रवाशांनी आनंद व्यक्त केला.