

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात १५ ते २० दिवस पुरेल इतकाच जिवंत पाणीसाठा आहे. अजून नियमित पावसाळ्याची चिन्ह दिसत नसल्याने रत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा एक दिवस आड करण्याची वेळ येण्याची भीती आहे.
पाणी पुरवठा समिती सभापती निमेश नायर अधूनमधून शीळ धरणावर भेट देऊन अधिकाऱ्यांशी पाणी पुरवठ्याबाबत चर्चा करत आहेत. रत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा सध्या आठवड्यातून एकदा बंद ठेवला जात आहे. आता शीळ धरणात ०. ५८ दशलक्ष घ.मी. इतका पाणीसाठा शिल्लक आहे. शहरवासियांना प्रतिदिन १९ ते २० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. यानुसार शीळ धरणात १५ ते २० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे.
अजून पावसाची चिन्ह दिसत नसल्याने पाणी पुरवठ्यात आणखी कपात होण्याची भिती आहे. धरणात ०.५८ दशलक्ष घ.मी. इतका जिवंत पाणीसाठा असून ०.५० दशलक्ष घ.मी. मृत पाणीसाठा आहे. मृत पाण्याची चव वेगळीच असल्याने नाईलाज असेल तेव्हाच या पाण्याचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला जातो. यावर उपाय म्हणून लवकरच एक दिवस आड पाणी पुरवठ्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. हे नियोजन झाले तर अर्ध्या शहराला एका दिवशी तर दुसऱ्या दिवशी राहिलेल्या शहराला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन होऊ शकते.