रत्नागिरी : रत्नागिरीतील ‘बाल्को’ प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या जमिनी परत करण्याच्या मागणीसाठी येथे सनदशीर मार्गाने या प्रकल्पग्रस्तांनी लढा सुरू ठेवला आहे, पण अजूनही त्यांच्या मागणीचा तिढा सुटत नसल्याने मंगळवारी देखील पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयावर शेती अवजारांसह मोर्चा काढला.
सन 1967 साली संपादित केलेल्या शिरगाव-चंपक मैदान परिसरातील सुमारे 1200 एकर जमिनीवर कोणताच प्रकल्प उभा राहिला नाही. मुळ मालकाकडून ही जमीन एमआयडीसीच्या ताब्यात आली असून, ही जमीन शेतकर्यांच्या ताब्यात देण्यात यावी अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे. त्यासाठी मंगळवारी देखील प्रकल्पग्रस्तांनी परटवणे ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून शासनाचे पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे. भारत सरकारने बाल्को या कंपनीमार्फत रत्नागिरीतील चंपक मैदान परिसरातील जागेवर अॅल्युमिनियम प्रकल्प उभारण्यासाठी शेतकर्यांच्या जमिन संपादीत केल्या. पण त्या जागांवर प्रकल्प आजमितीस उभा राहिलेला नाही.
संपादित केलेल्या जागा परत मिळण्यासाठी त्या जागेवर प्रकल्पग्रस्त आंदोलनात उतरले होते. त्यांनी जुलैमध्ये त्याठिकाणी सामूहीक शेती आंदोलन, त्यानंतर ऑगस्ट 2024 मध्ये देखील जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकर्यांनी निर्धार मोर्चा काढला होता. पुन्हा एकदा 4 सप्टेंबर रोजी प्रकल्पग्रस्तांनी एमआयडीसी कार्यालय असा जोरदार मोर्चा काढला. तरीही प्रकल्पबाधितांच्या मागणीला शासनाकडून न्याय मिळत नसल्याने मंगळवार 1 ऑक्टोबर रोजी पुन्हा पटरवणे ते जिल्हाधिकारी कार्यालयावर शेती अवजारांसह मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले आहे. जर शासनाने न्याय न दिल्यास पुढील आंदोलन तीव्र स्वरूपाचे राहिल असा इशारा यावेळी शेतकरी संघाचे अध्यक्ष राजेंद्र आयरे यांनी दिला आहे.