

रत्नागिरी : जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंध विभागाने मोठी कारवाई करत दोन महिला अधिकाऱ्यांना रंगेहात पकडले. तक्रारदार महिलेच्या वडिलोपार्जित जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर पतीचे नाव दाखल करण्यासाठी अर्ज दाखल केला असता, चौकशीदरम्यान २५ हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती.
पडताळणीदरम्यान १४ मे रोजी आरोपींनी तडजोडीअंती २० हजार रुपये लाचेची मागणी केली. त्याच दिवशी सापळा रचून तक्रारदारांनी आरोपी कोतवाल संजना माने यांना रक्कम दिली असता त्यांनी ती स्वीकारली. स्वीकारल्यानंतर त्यांनी मंडळ अधिकारी पुनम गावित यांना फोनद्वारे माहिती दिली.
दरम्यान १४ मे रोजी ४ वाजून ३० मिनिटांनी संजना माने या लाच घेताना रंगेहात पकडल्या गेल्या, तर पुनम गावित यांना राजापूरातून ताब्यात घेण्यात आले. आरोपींची झडती घेऊन मोबाईल जप्त करण्यात आला असून घरझडती देखील घेण्यात आली आहे. या प्रकरणात दोन्ही महिला अधिकाऱ्यांवर राजापूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम ७ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आले आहे.