

शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्या मातोश्री लिलाबाई गंगाराम कदम यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. निधनाच्या वेळी त्यांचे वय शंभर वर्षांपेक्षा जास्त होते. त्यांच्या निधनाने कदम कुटुंबासह संपूर्ण परिसरात दुःखाचे वातावरण पसरले आहे.
लिलाबाई कदम या राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या आजी होत. दीर्घकाळापासून त्या वयोमानानुसार आजारी होत्या आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कुटुंबीयांनी सांगितले की, त्या अत्यंत शांत स्वभावाच्या, सर्वांना स्नेहाने वागवणाऱ्या आणि धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाचा परिणाम म्हणूनच कदम कुटुंबातील अनेक सदस्य समाजकार्यात पुढे आले.
लिलाबाई कदम यांच्या पार्थिवावरील अंत्यसंस्कार आज दुपारी १ वाजता खेड तालुक्यातील जामगे येथे करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनानंतर कदम कुटुंबातील सदस्यांसह अनेक नातेवाईक, गावकरी आणि कार्यकर्ते जामगे येथे पोहोचू लागले आहेत.
मृत्युसमयी त्यांच्या मागे चार मुले, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे, नात सुना आणि नात जावई असा मोठा परिवार आहे. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती म्हणून त्यांचे मार्गदर्शन आणि सहवास सर्वांसाठी महत्त्वाचा होता.
स्थानिक सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून लिलाबाई कदम यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात येत आहे. अनेकांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले आहे. त्यांच्या निधनामुळे कदम कुटुंबाला मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.