

Raypatan Upper Tehsildar Office
राजापूर : रायपाटण येथे मंजूर झालेल्या अप्पर तहसीलदार कार्यालयाला विरोध करण्याच्या नावाखाली काही घटकांकडून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. रायपाटणच्या विकासात अडथळे निर्माण करण्याचे राजकारण तातडीने थांबवावे, असा घणाघाती आरोप रायपाटणचे सरपंच निलेश चांदे यांनी केला आहे. शासनाने सर्व सनदशीर प्रक्रिया पूर्ण करून मंजूर केलेल्या या कार्यालयाविरोधातील मोहीम ही जनहितासाठी नसून काहींच्या स्वार्थी राजकारणातून प्रेरित असल्याचा दावा त्यांनी केला.
रायपाटण येथे अप्पर तहसीलदार कार्यालय मंजूर झाल्यापासून काही व्यक्ती आणि संघटनांकडून विविध लोकप्रतिनिधी, वरिष्ठ महसूल अधिकारी तसेच महसूल मंत्र्यांकडे निवेदने देऊन या कार्यालयाला विरोध करण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र शासन स्तरावर त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे आता सार्वजनिक सूचना आणि हरकतींच्या प्रक्रियेचा आधार घेत परिसरातील नागरिकांवर दबाव निर्माण करण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप चांदे यांनी केला.
ते म्हणाले की, मागील चार महिन्यांपासून सातत्याने विरोधाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र सर्वसामान्य नागरिक रायपाटण येथे अप्पर तहसीलदार कार्यालय स्थापन होण्याच्या निर्णयाच्या बाजूने असल्याने विरोधकांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे खोट्या अफवा, दिशाभूल करणारी माहिती आणि संभ्रम निर्माण करणाऱ्या वक्तव्यांच्या माध्यमातून रायपाटणविरोधी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
"रायपाटणच्या विकासासाठी मंजूर झालेल्या या महत्त्वाच्या कार्यालयाला विरोध करणे म्हणजे संपूर्ण पूर्व राजापूरच्या जनतेच्या हितालाच विरोध करणे होय. अशा दहशतीच्या आणि दबावाच्या राजकारणाला बळी न पडता नागरिकांनी एकजुटीने अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या स्थापनेला पाठिंबा द्यावा," असे आवाहन त्यांनी केले.
रायपाटणमधील शासकीय इमारतींबाबत उपस्थित केल्या जाणाऱ्या आक्षेपांनाही चांदे यांनी प्रत्युत्तर दिले. रायपाटणमधील विविध शासकीय इमारती या ग्रामपंचायतीच्या मालकीच्या नसून शासनाच्या विविध विभागांच्या अखत्यारीत आहेत. अनेक वर्षे कोणत्याही प्रकारची हरकत न घेणाऱ्या व्यक्तींना आता अचानक या इमारतींमधील उणिवा दिसू लागल्या आहेत. त्यामुळे या विरोधामागील खरा हेतू जनतेच्या लक्षात आल्याचा दावा त्यांनी केला.
यावेळी त्यांनी विरोधकांच्या कार्यक्षेत्रातील मूलभूत प्रश्नांकडेही लक्ष वेधले. बाजारपेठेच्या विकासाचे गाजर दाखविणाऱ्यांनी प्रथम स्वतःच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामे, दिवाळवाडी धरणाच्या कालव्यावरील अतिक्रमणे, वाढती पार्किंग समस्या, दयनीय अवस्थेतील एसटी स्थानक, अपुरी स्वच्छतागृह व्यवस्था, कचरा व्यवस्थापनातील त्रुटी आणि वाहतूक कोंडी यांसारख्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावे, असा टोला त्यांनी लगावला.तसेच नागरिकांच्या सोयीसाठी विद्युत मंडळाच्या कार्यालयाची योग्य व्यवस्था उभारण्याची मागणीही त्यांनी केली.
रायपाटण विरोधात नाहक टीका करीत राहिलात तर आम्ही देखील सडेतोड उत्तरे देवू एवढे लक्षात ठेवा असा सूचक इशारा सरपंच चांदे यांनी दिला आहे. रायपाटणच्या विकासाला खीळ घालण्याऐवजी विकासकामांना सहकार्य करण्याची भूमिका सर्वांनी घ्यावी, असे ते म्हणाले.
शासनाने सर्व नियम व निकषांची पूर्तता करून रायपाटण येथे अप्पर तहसीलदार कार्यालय मंजूर केले आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात निर्माण करण्यात येणारा संभ्रम आणि विरोधाचे राजकारण फार काळ टिकणार नाही. रायपाटणच्या विकासाचा मार्ग रोखण्याचे प्रयत्न जनतेच्या एकजुटीसमोर निष्फळ ठरतील, असा ठाम विश्वास सरपंच निलेश चांदे यांनी व्यक्त केला.