

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने विविध उपाययोजना केल्यामुळे यावर्षी डेंग्यू रुग्णांची संख्या कमी आहे. जानेवारी ते जून या सहा महिन्यात आतापर्यंत पाच तालुक्यात ८ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव यांनी दिली.
रत्नागिरी जिल्ह्यात दडी मारलेल्या पावसाने जोरदार आगमन केले आहे. सलग चार दिवस पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दुसरीकडे साथीचे आजार होण्यास सुरुवात झाली आहे. पावसाचे आगमन झाल्रूनंतर लांजा शहरात डेंग्यूचा रुग्ण आढळल्यामुळे आरोग्य विभाग खडबडून जागे झाले आहे.हा रूग्ण जिल्हाबाहेरून आलेला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या कमी असून सहा महिन्यांत केवळ ८ रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये २ रुग्ण स्थानिक असून अन्य ६ रुग्ण बाहेरील जिल्ह्यातील आहेत. संगमेश्वर, लांजा, रत्नागिरी, गुहागर आणि दापोलीत डेंग्यू रुग्ण आढळले आहेत. मंडणगड, खेड, चिपळूण आणि राजापूर या चार तालुक्यांमध्ये एकही रुग्ण आढळलेला नसल्याचे सांगण्यात आले.