

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकणला जाणार्या प्रवाशांसाठी सध्या 8 डब्यांची धावणारी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव ही वंदे भारत एक्स्प्रेस (22229/22230) आता दुप्पट क्षमतेने म्हणजेच 16 डब्यांची चालवली जाणार आहे. यासाठी कोकण विकास समितीने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. दरम्यान, आठचे 16 डबे केल्यानंतर शनिवारी दुपारी या गाडीचे आरक्षण खुले होताच पुढील तासाभरातच फुल्लदेखील झाले.
मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यापासूनच या गाडीला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ही गाडी नेहमीच पूर्ण क्षमतेने धावत असल्याने कोकण विकास समितीने वेळोवेळी ही गाडी 16 किंवा 20 डब्यांची चालवावी, अशी मागणी केली होती. मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या लेखी पाठपुराव्यानंतर अखेर या मागणीला यश मिळाले आहे.
याबाबत रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, 25 ते 30 ऑगस्ट या कालावधीत ही गाडी 8 ऐवजी 16 डब्यांसह धावणार आहे. यामुळे गणेशोत्सवातील कोकणवासीयांची वाढती गर्दी कमी करण्यास मदत होणार आहे. या सहा दिवसांत वंदे भारत एक्स्प्रेसच्या डाऊनच्या तीन आणि अपच्या तीन अशा एकूण सहा फेर्या या 16 डब्यांच्या रेकसह होणार आहेत.
दरम्यान, गणेशोत्सवात आठऐवजी 16 डब्यांची वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय कोकणातील प्रवाशांची मागणी आणि गर्दी लक्षात घेता महत्त्वाचा ठरला आहे. यामुळे आता अनेक प्रवाशांना वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट बुकिंग करणे सोपे होणार आहे.
आठऐवजी 16 डब्यांची वंदे भारत एक्स्प्रेस धावणार असल्याने वंदे भारत एक्स्प्रेसची तिकिटे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. शनिवारी आठचे सोळा डबे झाल्यानंतर वाढीव डब्यांची गाडी आरक्षणासाठी खुली होताच पुढील तासाभरातच तिचे वाढीव आरक्षणदेखील संपले.