

रत्नागिरी : जिल्ह्यात लम्पी रोगाचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. मागील महिनाभरात 28 जनावरांना या रोगाची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यापैकी 1 पाळीव जनावर लम्पीने दगावले आहे. लागण झालेल्या जनावरांमध्ये वासरांचा समावेश अधिक असल्याचे पशुवैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले.
राज्यात लम्पी बाधीत जनावरे आढळल्यानंतर रत्नागिरीतही काही जनावरांना लागण झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे पशु विभाग सतर्क झाला आहे. रत्नागिरी, गुहागर, संगेश्वर तालुक्यात लागण झालेली जनावरे आढळली होती. तत्पूर्वी मे महिन्यामध्ये पशु विभागाकडून 1 लाख 61 हजार पाळीव जनावरांना लम्पीवरील लस देण्यात आली होती. त्यानंतर जून, जुलै या पावसाळ्यातील दोन महिन्यात रोगांची कोणतीही लक्षणे दिसलेली नव्हती, परंतु ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात बाधित जनावरे आढळू लागली.
रत्नागिरी तालुक्यात लम्पी बाधित वासरू मृत पावले. त्यानंतर सतर्क झालेल्या पशू विभागाने तातडीने मृत जनावरांच्या परिसरातील शेतकर्यांच्या जनावरांची तपासणी सुरू केली.
5 किलोमिटर परिसरातील काही संशयित जनावरांचे लसीकरणही केले गेले. संगमेश्वर तालुक्यात काही जनावरांना लम्पीची बाधा झाल्याच्या शेतकर्यांच्या तक्रारी पुढे येत आहेत. त्यात एका वासराचा लम्पीने मृत्यू झाल्याची तक्रार शेतकर्याने पशु विभागाकडे केली आहे.