रत्नागिरी : शिवसेनेचे पहिले जिल्हाप्रमुख आणि राजापूरचे माजी आमदार विजय तथा आप्पा साळवी यांचे आज (दि. १०) लोटलीकर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष कोकणात विशेषत: रत्नागिरीमध्ये रुजवायला आणि वाढवायला आप्पा साळवी यांचे योगदान आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष स्थापन झाल्यावर पहिले जिल्हाप्रमुख आप्पा साळवींना केले आणि कोकणची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर दिली. बाळासाहेबांचे निष्ठावंत कडवट शिवसैनिक, शिवसेनेचे पहिले जिल्हाप्रमुख, माजी नगरसेवक ते राजापूर मतदार संघाचे आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास होता. त्यांनी पक्षाची विविध पदे भूषविली. आज त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या थिबा पॅलेस येथील राहत्या निवास स्थानातून सायंकाळी ४ वा. निघणार आहे.