

मंडणगड (जि. रत्नागिरी) : राज्यघटनेच्या शिल्पकारांचे आंबडवे हे मंडणगड तालुक्यातील मूळ गाव जगाच्या नकाशावर येईल, अशा प्रकारे विकसित करण्याची राज्यकर्त्यांची महत्वाकांक्षा केवळ चर्चा, बैठका आणि घोषणा यावरच थांबली असल्याचे सध्या तरी चित्र दिसते. सन २०१४ साली केंद्र शासनानच्या आदर्श संसद ग्राम योजनेत आंबडवेच्या समावेशानंतर केंद्र व राज्य शासनाच्या यंत्रणांचा स्थानिक पातळीवर सुरु झालेला नियोजन बैठकांचा सिलसिला गेली दहा वर्षे अव्याहतपणे सुरु आहे. आंबडवेत चांगला सर्वांगीण विकास साधायचा यावर तर सर्वांचेच सकारात्मक मत आहे. वेळोवेळीच्या सर्वच राज्यकर्त्यांची येथील विकासाबाबत सकारात्मक भूमिका राहिली आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक ती कृती मात्र दिसत नाही.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याशी संबंधीत पंचतीर्थाचे धर्तीवरच आंबडवे या गावाचा विकास व्हावा, या करिता केंद्र शासन सकारात्मक राहिलेले आहे. त्या दृष्टीने येथील विकास झाल्यास तालुक्याच्या किंबहुना कोकणच्या, भविष्यातील विकासाच्या वाटचालीत आंबडवे गाव हे महत्वाची भूमिका बजावेल हे नक्कीच. पर्यटनाला खरं तर येथे तसे दुय्यम स्थान आहे.
गेल्या सात दशकातील तालुक्यातील एंकदरित वाटचालीचा विचार करता आंबडवे गावही यास अपवाद कसे ठरणार? येथे येणार्या प्रत्येक व्यक्तीने उच्चतम तत्वज्ञान मांडत मोठी अश्वासने दिली. मात्र, ती पूर्ण करण्यासाठी कृती मात्र केली नाही. सरकार व यंत्रणेला या ठिकाणाचे महत्व ठळकपणे माहिती असताना घेतलेली भूमिका अनाकलनीय अशीच आहे.
नुकतीच काही दिवसांपूर्वी आंबडवेच्या विकासासंदर्भात मंत्रालयात वरिष्ठ मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. बैठकीत विकासासंदर्भात चर्चा झाली खरी पण अद्यापही कार्यवाही दिसत नाही. कागदावरील उत्तम नियोजन, त्यासाठी आवश्यक साधनसामुग्री व मनुष्य बळ असताना येथे विकास योजना राबविण्यास अडचण कुठे आहे, याचे आकलन कुणालाच होत नाही. विशेष बाब म्हणून शासनाने निधीची उपलब्धता करणेही तितकेच आवश्यक आहे.
बाबासाहेबांच्या स्मृती व कार्यास या काळात उजाळ देण्याकरिता पर्यटनांपेक्षाही आंबडवे हे जागतिक दर्जाचे अभ्यासकेंद्र बनण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. महामानावाच्या मूळगावाचा विकास करणे हे केवळ स्थानिक लोकांसाठीच नव्हे, तर देशभरातील लोकांसाठी प्रेरणादायी ठरू शकते. येथील विकास नियोजनबद्ध आणि लोककेंद्रित केला, तर आंबडवे हे केवळ गाव न राहता एक प्रेरणास्थळ बनू शकते. त्या दृष्टीने तेथे पर्यटन व स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळू शकणार आहे.
आजच्या पिढीसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श कायम रहावा, या प्रमुख बाबीसाठी या ठिकाणाला अनन्यसाधारण महत्व आहे. तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही आपल्या आंबडवे गावाच्या दौर्यात या गावाचा ‘स्फूर्तीभूमी’ असा नामोउल्लेख केला व या गावाला सार्वत्रिक प्रयत्नांनी विकसित करण्याचे सूतोवाचदेखील केले होते.