रत्नागिरी : प्रेमाचे आमिष दाखवून लातूर जिल्ह्यातील उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला कोकणात डांबून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे.
उदगीर ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अवघ्या २४ तासांत या संपूर्ण गुन्ह्याचा छडा लावला आहे. पीडित मुलीची सुटका करत पोलिसांनी मुख्य आरोपीसह त्याला मदत करणाऱ्या सह-आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
या धडक कारवाईची माहिती उदगीर ग्रामीणचे पोलिस निरीक्षक गाडे यांनी दिली. उदगीर तालुक्यातील लोणी येथील एक अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाली होती. कुटुंबाने सर्वत्र शोध घेऊनही ती न सापडल्याने हतबल झालेल्या नातेवाईकांनी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेतली. मुलीचे वय लक्षात घेता पोलिसांनी तातडीने अपहरणाचा गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी संशयितांच्या मोबाईल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण सुरू केले.मुख्य आरोपीला मदत करणाऱ्या गणेश बसुराज फड या सह-आरोपीचा एक मित्र चिपळूणच्या ग्रामीण भागात राहतो. याच मित्राच्या घरात पीडित मुलीला डांबून ठेवण्यात आले होते.
उदगीर पोलिसांनी तातडीने स्थानिक यंत्रणेच्या मदतीने तिथे छापा टाकला. पोलिस संरक्षणात आल्यानंतर पीडित मुलीने रत्नागिरीत तिच्यावर झालेल्या अत्याचाराची आपबिती सांगितली. या भयानक प्रकारानंतर या प्रकरणात भारतीय न्याय संहिता आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) अंतर्गत अत्यंत कडक कलमे वाढवण्यात आली आहेत.
पोलिसांनी कृष्णा अच्युत फड (वय १८, मुख्य आरोपी) आणि गणेश बसुराज फड (२०, सह-आरोपी) यांना बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने आरोपींना पोलिस कोठडी सुनावली असून पोलिस आता चिपळूणमधील त्या स्थानिक मित्राच्या भूमिकेसह या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.