

रत्नागिरी : व्हिसाचा कालावधी संपूनही शहरातील साळवी स्टॉप येथे बेकायदेशिरपणे वास्तव्य तसेच बनावट कागदपत्रे तयार करणार्या बांगलादेशी महिलेला न्यायालयाने बुधवारी सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. तिला 17 जानेवारी 2025 रोजी दहशतवाद विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली होती.
सलमा खातून बिलाल मुल्ला उर्फ सलमा राहिल भोंबल (30,रा.सफा टॉवर्स बिल्डिंग ए विंग मधील फ्लॅट नंबर ए 9, साळवी, रत्नागिरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या बांग्लादेशी महिलेचे नाव आहे. सलमा ही 16 डिसेंबर 2016 रोजी 90 दिवसांचा व्हिसा घेऊन भारतात आली होती. यावेळी तिचे वास्तव्य शृंगारतळी गुहागर याठिकाणी होते. यानंतर सलमा हिने राहिल भोंबल याच्याशी विवाह केला. तसेच व्हिसाची मुदत संपली असतानाही तिने 2017 ते 2025 या कालावधीत अवैधरित्या भारतात वास्तव्य केले.
या काळात सलमा हिने आधारकार्ड, पॅनकार्ड, जन्मदाखला आदी बनावट कागदपत्रे तयार करत भारतात वास्तव्य केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला होता. तिच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता 1950 चा नियम 3(ए),6(ए) विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 चे कलम 14 (अ) व कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला न्यायालयात सुरु होता. बुधवारी मुख्य न्याय दंडाधिकारी गोसावी यांनी आरोपी महिलेला 6 महिने साधा कारावास व पाचशे रुपये दंड तो न भरल्यास 1 दिवस साधा कारावास अशी शिक्षा सुनावली. या खटल्यात शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश शिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासिक अधिकारी म्हूणन पोलिस उप निरीक्षक शितल पाटील यांनी काम पाहिले. तर पैरवी अंमलदार म्हणून महिला पोलिस हवालदार साळवी व पाटील यांनी काम पाहिले.