

रत्नागिरी : लांजा तालुक्यातील अंजणारी गावातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील आजी-माजी सरपंचांसह अनेक ग्रामस्थांनी पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे अंजणारी गावात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाली असून आगामी काळात गावाच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
शिवसेना पक्षात प्रवेश करणाऱ्या आजी-माजी सरपंचांसह ग्रामस्थांचे पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांनी पक्षाच्यावतीने स्वागत केले. पक्षप्रवेशाच्या या कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंजणारी गावाच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविणे, ग्रामस्थांच्या मूलभूत समस्या सोडविणे, रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, रोजगार तसेच गावातील पायाभूत सुविधांना चालना देणे यासाठी शासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील, अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी प्रवेश करणाऱ्यांमध्ये गणेश जोशी, शब्बीर संगरार, रवीकांत शिखरे, प्रमोद कांबळे, संध्या तांबे, नामदेव पाष्टे, नुरुद्दीन ठोंगे, शुभांगी शिर्के, सोना पेंढारी, वसंत जोशी, जयनुद्दीन ठोंगे, प्रकाश शिखरे यांच्यासह ग्रामस्थांचा समावेश होता.