कोकणातील गरिबी, बेरोजगारी दूर करणे हे माझे ध्येय – नारायण राणे | पुढारी

कोकणातील गरिबी, बेरोजगारी दूर करणे हे माझे ध्येय - नारायण राणे

साडवली (जि. रत्नागिरी) : पुढारी वृत्तसेवा – आपले कोकण अतिशय समृद्ध आहे. मात्र कोकणातील गरिबी, बेरोजगारी दूर करण्यासाठी आपला प्रामाणिक प्रयत्न असणार आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचा जो उमेदवार असेल त्याला निवडून आणण्यासाठी सर्वांनी एकजुट होऊन कामाला लागा, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देवरूख येथील महायुतीच्या मेळाव्यात केले. या मेळाव्यात त्यांनी ठाकरे गट आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली.

देवरूख येथील माटे-भोजने सभागृहात मंगळवारी सायंकाळी महायुतीचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना राणे म्हणाले, देवरूख ही माझी सासरवाडी आहे. बऱ्याच दिवसांनी सासरवाडीला म्हणजेच देवरूखला तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आलो आहे. देवरूखला येऊन तुम्हाला पाहून खूप बरे वाटले. तुमची एकजुट पाहून विजय आपलाच आहे, यात तीळमात्र शंका नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आपल्याला सर्वांना अभिमान वाटेल, असे काम करत आहेत. जगाच्या अर्थव्यवस्थेत मोदीजींनी आपल्या देशाला पाचव्या क्रमांकावर नेले आहे. अमेरिका, चीननंतर भारत तिसऱ्या क्रमांकावर असेल हे मोदीजींचे स्वप्न आहे.

महिलांना लखपती करण्याचे काम मोदीजी करत आहेत. ४ कोटी निराधार लोकांना मोदीजींनी पक्की घरे दिली आहेत. कोरोना काळात मोदीजींनी लोकांचे प्राण वाचवले. कोरोना काळात ८० कोटी लोकांना मोदीजींनी मोफत धान्य सुरू केले. मोदीजींनी देशासाठी काम केले आहे. ते आजही काम करत आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त खासदार आपण निवडून देऊन मोदीजींचे हात आपल्याला बळकट करायचे आहेत. यासाठी आता जशी एकजूट केलीत तशीच एकजूट कायम ठेवून रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी महायुतीच्या उमेदवाराला निवडून देवून खासदार म्हणून संसदेत पाठवण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे राणे यांनी म्हटले.

यावेळी माजी खासदार निलेश राणे यांनी बोलताना म्हटले, संगमेश्वर तालुक्यात वीज, पाणी या समस्या आहेत. ती आपल्याला दूर करायची आहे. तालुक्यात मार्लेश्वरसारखे राज्यात प्रसिद्ध असलेले पर्यटनस्थळ आहे. अशी अनेक पर्यटनस्थळे आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात याठिकाणी पर्यटक येत असतात. ही या तालुक्याची ओळख आहे. येथील तरूणांच्या हाताला आपल्याला काम द्यायचे आहे. तालुक्याला आमदार शेखरजी निकम सरांनी भरपूर निधी दिला. त्यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे झाली आहेत. ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. त्यामुळे देशाच्या खासदारांमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्गाचा आपला खासदार असला पाहिजे, असे निलेश राणे म्हणाले.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अजित यशवंतराव म्हणाले, राणे साहेबांनी कोकणचा कायापालट केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्यायचे आहे. भाजपचे नेते संदीप कुडतडकर, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका संघटक बाळू ढवळे आणि आरपीआयचे राजेंद्र मोहिते यांनी महायुतीच्या उमेदवाराचा विजय नक्की असल्याचे सांगितले.

या मेळाव्याला भाजपचे नेते अतुल काळसेकर, जिल्हा नेत्या रश्मीताई कदम, जिल्हा सरचिटणीस संगिताताई जाधव, माजी नगराध्यक्षा सौ. मृणाल शेट्ये, स्वाती राजवाडे, जेष्ठ नेते मुकुंद जोशी, विधानसभा क्षेत्राध्यक्ष प्रमोद अधटराव, सदानंद भागवत, तालुकाध्यक्ष रूपेश कदम, माजी उपनगराध्यक्ष अभिजीत शेट्ये, निलेश भुरवणे, सुधीर यशवंतराव, अमोल गायकर, प्रथमेश धामणस्कर, प्रमोद शिंदे, सचिन बांडागळे, अभिजीत सप्रे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नितीन भोसले, प्रफुल्ल भुवड, पंकज पुसाळकर, मुरादपूरचे माजी सरपंच मंगेश बांडागळे, मुराद आंबेडकर उपस्थित होते. प्रास्ताविक प्रमोद अधटराव यांनी केले. सूत्रसंचालन-आभार सुशांत मुळ्ये यांनी मानले.

 

Back to top button