रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा हक्काची : उदय सामंत | पुढारी

रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा हक्काची : उदय सामंत

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा ही शिवसेनेची हक्काची जागा आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री हे वरिष्ठ नेते असून त्यांना राज्याची भौगोलिक परिस्थिती माहिती आहे. त्यामुळे तेच या जागेबद्दल निर्णय घेतील, असे स्पष्ट मत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

आपले मोठे बंधू किरण ऊर्फ भैया सामंत यांना नागरिकांचा पाठिंबा असून आग्रहही आहे. त्यांनी लोकसभेत जावे, असे मलाही वाटत आहे; परंतु निवडणुकीसाठी त्यांनी उभे राहावे की नाही, हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचेही ना. सामंत यांनी स्पष्ट केले. सध्या ते रत्नागिरीत मेळावे व शिवसेना पक्षप्रवेश कार्यक्रमात उपस्थित राहत आहेत. त्यामुळे ते शिवसेनेमध्येच आहेत. त्यांनी निवडणूक लढवली, तर तिही शिवसेनेमधूनच असेल, असेही ना. सामंत यांनी स्पष्ट केले. आमचे नेते एकनाथ शिंदे यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे.
कोणी या मतदारसंघावर दावा केला तरी शिंदे-फडणवीस-पवार हेच मतदारसंघांबाबत निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले.

याचवेळी नांदेड दुर्घटनेबाबत बोलताना ते म्हणाले की, या घटनेचे समर्थन करता येणार नाही. या प्रकारानंतर आपण तातडीने रत्नागिरी व रायगडमधील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनीही सर्व जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करुन भेटी देण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज झाले पाहिजे, असे स्वप्न आहे. ते पूर्ण होण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्याचा मोठा प्रश्न निकाली निघेल, असेही त्यांनी सांगितले.

माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या टीकेवर बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदे यांचे आरोग्याच्या क्षेत्रात मोठे काम आहे. ते घरात बसून काम करीत नाहीत किंवा कोणतेही आदेश ‘फेसबूक लाईव्ह’ करीत नसल्याचा टोलाही मारला. शिंदे व 40 आमदारांवर गद्दार व खोके घेतल्याचा आरोप केला जातो, मग उध्दव ठाकरेंनी आता अजितदादा गद्दार आहेत की खोके घेतले तेही एकदा जाहीर करावे, असे आव्हानही त्यांनी दिले.

Back to top button