पुढारी ऑनलाईन डेस्क: अनेक राज्यात पावसाची संततधार सुरूच आहे. आसाम आणि गुजरातमध्ये तर पावसाने थैमान घातले आहे. याठिकाणी मुसळधार पावसाने पूरपरिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे, अनेक शहरांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान राज्यातील काही भागात देखील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यातील संपूर्ण घाटमाथा क्षेत्रासह, मध्य महाराष्ट्रात ५ जुलै ते ८ जुलै दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गोव्यामध्ये देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे देखील हवामान विभागाने म्हटले आहे.
कोकण आणि घाट क्षेत्रासह पश्चिम किनारपट्टीचा काही भाग, पूर्वोत्तर प्रदेशाचा काही भाग, मराठवाड्याचा काही भाग, विदर्भासह मध्य भारताचा काही भागात 7 जुलै ते 11 जुलै या कालावधीत पर्जन्यमान अंदाज वर्तवण्याचा आल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
ईशान्य भारतातील अरुणचल प्रदेश, आसाम आणि मेघालय या राज्यात पुढील दोन दिवस अतिवृष्टीची शक्यता आहे. या राज्यात ४ जुलै ते ६ जुलै पर्यंत अतिवृष्टीचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. उप हिमालय, पश्चिम बंगाल, सिक्कीम (४ ते ६ जुलै), बिहार (४ आणि ५ जुलै), अरुणाचल प्रदेशमध्ये (४ जुलै ते ८ जुलै), आसाम, मेघालय (७ जुलै, ८ जुलै), नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा या राज्यात ४ जुलै आणि ५ जुलै रोजी अतिमुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान ४ जुलै ते ६ जुलै रोजी उत्तराखंडमध्ये देखील अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.